

Rajkot Fort Open
उदय बापर्डेकर
मालवण: येथील नेहमीच पर्यटकांचे आकर्षण असलेला ऐतिहासिक राजकोट किल्ला पालकमंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानंतर आज पुन्हा पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. यामुळे दिवाळी सुट्टीमध्ये मालवणमध्ये आलेल्या सर्व पर्यटकांना दिलासा मिळाला आहे. तसेच स्थानिक पर्यटन व्यावसायिकांचा व्यवसाय पुन्हा तेजीत येणार आहे. या निर्णयाबद्दल सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा खोत यांनी पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे आभार मानले आहेत.
यंदाच्या दिवाळी सुटीत मालवणमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले आहेत. मात्र, वादळी पावसामुळे ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्ग पर्यटनासाठी तसेच जलक्रीडा तात्पुरत्या स्वरूपात बंद असल्याने पर्यटकांचा काही प्रमाणात हिरमोड झाला होता. त्यामुळे अनेक पर्यटकांनी आपले लक्ष रॉकगार्डन आणि राजकोट किल्ला या स्थळांकडे वळवले होते.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी अचानक सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्तीच्या कारणास्तव राजकोट किल्ला पर्यटकांसाठी बंद केला होता. ऐन पर्यटन हंगामात किल्ला बंद झाल्याने पर्यटकांची मोठी गैरसोय झाली. तसेच स्थानिक व्यावसायिकांचेही मोठे आर्थिक नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला. याबाबत सोमवारी स्थानिक पर्यटन व्यावसायिकांनी सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा खोत यांची भेट घेऊन लक्ष वेधले होते. खोत यांनी तत्काळ भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्याकडे पाठपुरावा करून पालकमंत्री नितेश राणे यांच्या निदर्शनास आणून देण्याची विनंती केली. त्यानंतर पालकमंत्री नितेश राणे यांनी तहसीलदारांना मंगळवार पासून राजकोट किल्ला पर्यटकांसाठी खुला करण्याचे निर्देश दिले.
पर्यटकांना ऐतिहासिक स्थळाचा आनंद घेता येणार
पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार राजकोट किल्ला मंगळवारपासून पर्यटकांसाठी पुन्हा खुला करण्यात आला आहे. यामुळे पर्यटकांना मालवणच्या या सुंदर ऐतिहासिक स्थळाचा आनंद घेता येणार आहे. तर स्थानिक पर्यटन व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.