

कणकवली : पुढारी वृत्तसेवा
कोरोना काळात उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र कलंकित केला, आम्ही त्यावर राजकारण केले नाही. मात्र संजय राऊत हे बांद्रा रेल्वे स्टेशनवर गोरखपुर एक्सप्रेसमध्ये चेंगराचेंगरीत नऊ जखमी झाले त्याचे राजकारण करत आहेत.
अशा कपटी लोकांना राजकारणातून हद्दपार केले पाहिजे, अशी टीका भाजप प्रवक्ते आ. नितेश राणे यांनी केली. कणकवलीत ते पत्रकारांशी बोलत होते. राणे म्हणाले, बांद्रा स्टेशनवर घडलेल्या घटनेबाबत केंद्र सरकार उपाययोजना करेल. पुन्हा अशी घटना घडू नये म्हणून मार्ग काढला जाईल.
मोदी सरकार आल्यापासून रेल्वे अपघात कमी झाले आहेत. मात्र यात घाणेरडे राजकारण संजय राऊत यांनी सुरु केले आहे. कोणत्या गोष्टीवर राजकारण करावे याची नैतिकता राऊत यांना नाही. कोरोना काळात उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राची बदनामी केली, तरी आम्ही सभ्यता म्हणून शांत राहिलो.
स्वतःच्या बुडाखाली किती आग लागलीय ते पाहायचं नाही आणि दुसऱ्यांवर आरोप करत सुटायचे हे संजय राऊत यांनी बंद करावे. ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात ते रेल्वेमंत्री होते तेव्हा त्यांच्या काळात अपघात झाले नाहीत का? आमचे रेल्वे मंत्री ऑनफिल्ड आहेत, तुमच्या मालकासारखे ऑनलाईन नाहीत. आधुनिकतेच्या गप्पा मारायच्या आणि बुलेट ट्रेनच्या विषयात फोडाफोडी करायची.
व्यक्तीगत दुश्मनी करण्याबाबत जर पुरस्कार द्यायचा असेल तर त्याचे उद्धव ठाकरे पहिले मानकरी ठरतील. भाजप नेते नारायण राणे यांना जेवणाच्या ताटावरून अटक करण्याचा प्रयत्न करणे, त्यांचे कुटुंब, नातवंडे ज्या घरात राहतात ते घर तोडण्याचा प्रयत्न करणे, कंगना राणावतचे घर तोडणे, अर्णव गोस्वामीला अटक करणे याला दुश्मनी म्हणतात. दुश्मनीत पीएचडी केलेल्यांनी आमच्या नेत्यांवर टीका करू नये, असा इशारा नितेश राणे यांनी दिला.