

कणकवली ः मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा माजी आ. वैभव नाईक यांनी पाडला असल्याचे वक्तव्य कुडाळ-मालवणचे विद्यमान आ. नीलेश राणे हे करीत आहेत. मात्र, आ. नीलेश राणे यांचे हे वक्तव्य म्हणजे त्यांचा अज्ञानीपणा आहे. हा फेक नरेटिव्ह निर्माण करण्याचा प्रकार आहे. ढकलून पुतळा पडत असेल तर तो एवढा तकलादू होता का? असा सवाल माजी आ. परशुराम उपरकर यांनी केला आहे.
कणकवली येथील आपल्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत उपरकर बोलत होते. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मालवण राजकोट येथील पुतळा बांधकामाबाबतव स्क्रूनट निखळल्याबाबत सा. बां.च्या उपअभियंत्यांचे पत्रही आमच्याकडे आहे. त्यामुळे आमदारांनी असे वक्तव्य करणे हे अज्ञानीपणाचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्क्रू निखळत होते, हे अधिकार्यांसहीत सर्वांना माहिती होते. हा पुतळा सा. बां.च्या देखरेखीखाली झाला होता. शेवटच्या काही दिवसांत नेव्हीने हे काम जमणार नसल्याचे सांगितले होते असे समजते तसेच पुतळा उभारल्यानंतर तीन महिन्यांत नेव्हीने तो सा. बां.कडे हस्तांतरीत केला. उपअभियंत्यांनी स्क्रू निखळत असल्याचे पत्रही दिलेले होते, ते आमच्याकडे आहे. याचाच अर्थ पुतळ्याचे काम योग्य नव्हते, म्हणून तो पुतळा पडला, तो कुणी पाडण्याची गरज नाही. पुतळा पडल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री सांगतात की, वार्यामुळे पुतळा पडला तर त्यांचेच आमदार निलेश राणे सांगतात माजी आमदारांनी पाडला. तसेच पुतळा पडल्यानंतर 15 मिनीटात माजी आमदार कसे पोहोचले? असा सवाल करतात. मुळात पुतळा पडल्यानंतर दोन मिनिटांत आम्हालाही कळले. माजी आ. नाईक मतदारसंघात असताना त्यांना पोहोचण्यास वेळ कसा लागणार त्यामुळे आमदारांनी असे वक्तव्य करणे योग्य नाही.
ते म्हणाले, सध्या पुतळ्याचे काम नविन व योग्य शिल्पकाराकडून व योग्य कार्यकारी अभियंत्यांच्या देखरेखीखाली केले जात आहे, हे आम्हालाही मान्य आहे. या कार्यकारी अभियंत्यांनी चूकीचे झालेले फाऊंडेशनही काढायला लावले आहे. आम्हीही चांगल्याला चांगले म्हणणारे व वाईटला वाईटच म्हणणारे आहोत. त्यामुळे कुणीही नको ती वक्तव्ये करून वातावरण दूषित करण्याचा कितीही प्रयत्न केला तरीही त्याचा उपयोग होणार नाही. फेक नरेटिव्ह निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका असा सल्ला उपरकर यांनी दिला आहे.