

देवगड : निसर्गचक्रामध्ये प्रत्येक प्राण्याला काहीना काही काम दिलेले असते. ती कामे चोख पार पाडली तर निसर्गही आपल्याला भरभरून काहीतरी देत असतो. कासवांची घरटी जतन करून त्यांचे संगोपन करण्याचे महत्वाचे काम आपलं गाव करत आहे. कासवाचे संगोपन करण्याचे काम आपल्या गावातून कायमस्वरुपी सुरू रहावे, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी मुणगे येथील कासव महोत्सवादरम्यान व्यक्त केली. वनविभाग कांदळवन कक्ष महाराष्ट्र राज्य वनपरिक्षेत्र कांदळवन मालवण यांच्या वतीने मुणगे आडवळवाडी समुद्रकिनारी आयोजित केलेल्या कासव महोत्सव दरम्यान ते बोलत होते.
यावेळी मुख्यकार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, पोलिस निरीक्षक मगदूम, सावंतवाडी वनरक्षक सुनील लाड, देवगड तहसीलदार रमेश पवार, गटविकास अधिकारी वृक्षाली यादव, सरपंच अंजली सावंत, वनविभागीय अधिकारी कांचन पवार, सहाय्यक वनसंरक्षक (दक्षिण कोकण) प्रियांका पाटील, उपवनरक्षक एस नवकिशोर रेडी, वनपरिक्षेत्रपाल मालवण समीर शिंदे, सहाय्यक उपवन रक्षक सुनील लाड, वनपरिक्षेत्र अधिकारी कणकवली राजेंद्र धुणकीकर, वन परिक्षेत्रपाल कुडाळ, संदीप कुंभार, नागेश दफ्तरदार आदी उपस्थित होते.
पुढे जिल्हाधिकारी पाटील म्हणाले, कासवांचे संवर्धन झाले नाही तर समुद्र स्वच्छ होत नाही. माशाचे प्रजनन होत नाही, यासाठी कासवांचे संवर्धन होणे काळाची गरज आहे. गावाच्या ज्या समस्या आहेत. त्या मी पालकमंत्र्यांपर्यंत पोहोचवेन. पालकमंत्री या विभागातून निवडून आलेले आमदार आहेत. ते आपल्या या मागणीचा नक्की विचार करतील. या भागातील रस्ते, मासेमारी सुविधा येणाऱ्या काळात उपलब्ध होतील.
या कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांचा वनविभागाच्या वतीने व मुणगे गावच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच वन विभागाकडून मुणगे, मोर्वे, तांबळडेग येथील कासव मित्रांचा उपस्थित मान्यवरांचा हस्ते सत्कार करण्यात आला.
देवगड तालुक्यात मुणगे येथे हा कासव महोत्सव प्रथमच भरण्यात आला. यापूर्वी वेगुर्ले व मालवण वायंगणी या ठिकाणी कासव महोत्सव आयोजित करण्यात आले होते. मुणगे येथील कासव मित्र अनिल रासम हे २००९ पासून यशस्वीरित्या कासव संवर्धनाची मोहीम जतन करत आहेत. यावर्षी त्यांनी मुणगे बीच, मोर्वे बीच या ठिकाणी असलेले ९५ ठिकाणी असलेली कासवांची अंडी एकत्र करून त्याचे संरक्षक कुंपण बांधून मुणगे आडवळ वाडी येते जतन केले. रासम यांनी एकत्रित केलेल्या समुद्र कासवांच्या अंड्याना पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्व प्राप्त व्हावं, या उद्देशाने मत्स्य व्यवसाय व बंदर विकासमंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री नितेश राणे यांनी कासव महोत्सवाची संकल्पना पुढे केली. त्यानंतर हा कासव महोत्सव देवगड मुणगे येथे प्रथम भरविण्यात आला. यावेळी उपस्थित वन विभागाच्या कर्मचारी व ग्रामस्थांच्या वतीने समुद्र कासवांची १४ घरट्यातली अंडी समुद्रात सोडण्यात आली. इतर प्रकल्पात जी अंडी आहेत ती टप्प्याटप्प्याने पिल्ले जन्म घेतील, त्यानुसार समुद्रात सोडण्यात येतील. वनविभागाच्या वतीने कासवमित्र अनिल रासम यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.