

कणकवली : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे यांचा 75 वा वाढदिवस शुक्रवार, 10 एप्रिल रोजी साजरा केला जात आहे. त्यांचे हे अमृत महोत्सवी म्हणजेच 75 व्या वर्षात पदार्पण आहे. यानिमित्त पुढील 2027 च्या वाढदिवसापर्यंत वर्षभर विविध कार्यक्रम साजरे करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. तर वाढदिवसानिमित्त शुक्रवार, 10 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानावर भव्य वाढदिवस सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री उदय सामंत यांच्यासह अनेक मंत्री, आमदार उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली.
प्रहार भवन मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत श्री. सावंत बोलत होते. यावेळी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक , भाजप महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, कणकवली सभापती हर्षदा वाळके, उपसभापती सोनू सावंत, जि. प. सदस्य मनोज रावराणे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, बँक संचालक प्रकाश मोरेये, भाजप कणकवली तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, कणकवली शहर अध्यक्ष अण्णा कोदे आदी उपस्थित होते.
प्रभाकर सावंत म्हणाले, कोकणात विशेषतः जिल्ह्यात जे सण उत्सव साजरे केले जातात त्याप्रमाणे खा. नारायण राणे यांचा वाढदिवस देखील दरवर्षी साजरा केला जातो. कारण नारायण राणे यांनी गेली चार दशके आपल्या कार्यकर्तृत्वाने जिल्ह्याचे, कोकणचे नाव रोशन केले आहे. त्यांचा 74 वा वाढदिवस साजरा होत असून ते अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहेत. म्हणूनच आम्ही अमृत महोत्सवी पदार्पण सोहळा यावर्षी राबवत आहोत. पुढील वर्षभर दर महिन्याला 10 तारीखच्या दरम्यान विविध उपक्रम रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात राबविले जाणार असल्याचे प्रभाकर सावंत यांनी सांगितले.
पुष्पगुच्छ नको, पुस्तके द्या- जिल्हाध्यक्षांचे आवाहन
प्रभाकर सावंत म्हणाले, खा. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त 10 एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता उपजिल्हा रुग्णालय समोरील मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने खा. नारायण राणे यांना पुष्पगुच्छ भेट देण्यापेक्षा पुस्तक भेट द्या. ही पुस्तकांची भेट सोहळ्याच्या प्रवेशद्वारावरच स्वीकारण्याची व्यवस्था केली जाणार आहे. हजारो पुस्तके या निमित्ताने संकलीत होतील. ही पुस्तके विविध ग्रंथालयांना देण्यात येणार आहेत. कोकणातील वाचन चळवळ वृद्धिंगत व्हावी हा यामागचा उद्देश आहे. या कार्यक्रमात तीन सेल्फी पाँईट असणार असून तेथे उभे राहून खा. नारायण राणे यांना पूस्तक भेट देतानाचा फोटो काढता येईल असे सावंत म्हणाले. खा. नारायण राणे यांचा वाढदिवस केवळ पक्षातील कार्यकर्ते यांच्या पूरताच मर्यादीत नसतो तर समाजातील अनेक मंडळी त्यांच्या वाढदिवसाला उपस्थित असतात. खा. राणे यांनी चार दशके कोकणाची सेवा केली आहे. सहाजिकच त्यांच्या वाढदिवसाला सर्वपक्षीय मंडळी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे त्यांना विशेष निमंत्रण देण्याची व्यवस्था आम्ही केली आहे. या विशेष निमंत्रितांना स्वतंत्र आसन व्यवस्था देखील केली जाणार आहे. तरी या अमृत महोत्सवी वर्ष पदार्पण वाढदिवस सोहळ्याला रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील सर्व कार्यकर्ते, नागरीक, हितचिंतक, पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन प्रभाकर सावंत यांनी केले.