

ओरोस : जिल्ह्यातील नादुरुस्त हवामान मापन केंद्रे तातडीने दुरुस्त करून ती कार्यान्वित करावीत. या केंद्रांतील तांत्रिक त्रुटी त्वरित दूर करून नोंदविल्या जाणाऱ्या माहितीची काटेकोर पडताळणी करावी, जेणेकरून चुकीच्या नोंदींमुळे एकाही शेतकऱ्याचे नुकसान होणार नाही, असे स्पष्ट निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत.
जिल्ह्यातील फळपीक विमा योजनेंतर्गत नुकसानभरपाई वितरणातील त्रुटी आणि हवामान मापन केंद्रांच्या सद्यस्थितीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील तारिणी सभागृहात विशेष आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पालकमंत्री बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्यासह कृषी विभाग, स्कायमेट आणि पीक विमा कंपनीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री राणे म्हणाले की, संकटाच्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणे हा फळपीक विमा योजनेचा मुख्य उद्देश आहे. मात्र, हवामान केंद्रांतील बिघाड, तांत्रिक अडचणी किंवा चुकीच्या माहितीमुळे पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्यामुळे सर्व विभागांनी समन्वयाने काम करून प्रत्येक केंद्र अचूक माहिती देईल, याची दक्षता घ्यावी.
या बैठकीत नादुरुस्त केंद्रांमुळे विमा दाव्यांवर झालेल्या परिणामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. हवामान मापनातील प्रत्येक नोंद विश्वासार्ह राहण्यासाठी आवश्यक त्या सुधारणा करण्याचे आणि प्रलंबित प्रकरणे निकाली काढून शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.