

कणकवली : मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सिंधुदुर्ग व कोकणातील आंबा-काजू हंगामातील नुकसानीचा मुद्दा पालकमंत्री नितेश राणे यांनी ठामपणे मांडला. यावर्षी आंबा मोठ्या प्रमाणात गळून पडल्याने बागायतदारांवर आर्थिक संकट ओढवले असल्याची माहिती मुख्यमंत्री व मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी विभागाकडून तातडीने परिस्थितीचा सविस्तर अहवाल मागवण्याचे निर्देश दिले असून, लवकरच त्यांच्या नेतृत्वाखाली आंबा बागायतदारांची बैठक घेऊन मदतीबाबत निर्णय घेतला जाणार आहे. राज्य सरकार आंबा बागायतदारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, अशी ग्वाही मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली.
यावर्षी डिसेंबर महिन्यात सलग तीन दिवस तापमान खूपच खाली आले होते. त्याचा परिणाम म्हणून जो मोहोर आला तो फिमेल ऐवजी मेल स्वरूपाचा अधिक असल्यामुळे या मोहोराला फळधारणा होऊ शकली नाही. काही टक्के फळधारणा लागली खरी; परंतु तीही फळे गळून पडली. अगदी तसेच नुकसान काजू पिकाचेही झाले आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू बागायतदार हवालदिल झाले. त्यांनी पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन ही वस्तुस्थिती मांडली होती. शेतकरी आर्थिक अडचणीत आले असून, त्यांना सरकारने तातडीने मदत करण्याची आवश्यकता होती. हा मुद्दा मंगळवारी मुंबईत झालेल्या राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत पालकमंत्री नितेश राणे यांनी मांडला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या भुमिकेबाबत मंत्री नितेश राणे यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली.
मंत्री नितेश राणे यांनी सांगितले की, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आपण सिंधुदुर्ग आणि कोकणच्या आंबा, काजू विषयी चर्चा घडवून आणली. एकंदरीत आंबा- काजूची परिस्थिती अशी आहे की, या वर्षीचा हंगाम पाहता आंबा गळून पडला आहे. याबाबतची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पूर्ण मंत्रिमंडळासमोर मांडली. माझे म्हणणे ऐकल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी मंत्रालयाच्या सचिवांंना याबाबतच्या परिस्थिची माहिती घेण्यास सांगितली. या एकंदरीत अभ्यासानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आंबा बागायतदारांच्या संदर्भात एक बैठक लवकरात लवकर घेतली जाईल. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरात लवकर निर्णय घेण्याच्या दृष्टीकोनातून निर्देश दिलेले आहेत.
राज्य सरकार म्हणून आंबा बागायतदारांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहणार आहोत.लवकरात लवकर मदत देण्याच्या दृष्टिकोनातून आमचे काम सुरू झालेल आहे, अशी माहिती मंत्री नितेश राणे यांनी दिली. मंत्री नितेश राणे यांनी ही माहिती दिल्यामुळे हवालदिल झालेले आंबा बागायतदार यांच्यासमोर आशेचा किरण निर्माण झाला आहे. त्यांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान पिकांच्या नुकसान भरपाईसाठी अभ्यास गट स्थापन केला जाणार असून याबाबत या अभ्यास गटाच्या शिफारसीनूसार भरपाई देण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.