

मालवण : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची दुर्घटना ही देशात प्रथमच घडली आहे. या पुतळा दुर्घटनेच्या निषेधार्थ गुरूवारी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात काळ्या फिती लावून मूक आंदोलन केले आहे. सरकारने आता मालवण राजकोट येथे शिवरायांचे असे स्मारक उभारावे जे देशासाठी मानबिंदू असेल. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शिवप्रेमी म्हणून आवश्यक ते सहकार्य केले जाईल, असे प्रतिपादन अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांनी केले. यावेळी राष्ट्रवादीतर्फे काळ्या फिती लावून शिवपुतळा दुर्घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला.
मालवण-राजकोट येथील शिवपुतळा कोसळल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी गुरूवारी राजकोट येथे भेट देऊन पाहणी केली. जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, जिल्हा सरचिटणीस सावळाराम अणावकर, प्रदेश चिटणीस सुरेश गवस, प्रदेश चिटणीस एम. के. गावडे, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत, प्रांतिक सदस्य विलास गावकर, सावंतवाडी तालुका अध्यक्ष उदय भोसले, महिला जिल्हाध्यक्ष प्रज्ञा परब आदी उपस्थित होते. उपस्थित राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' अशा घोषणा देण्यात आल्या.
अबीद नाईक म्हणाले, शिवपुतळा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सुचनेनुसार गुरूवारी राज्यभरात काळ्या फिती लावून मूक आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यातही हे आंदोलन करण्यात आले. राजकोट शिवपुतळा दुर्घटनेतील दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. तसेच युगपुरुषांच्या बाबतीत भविष्यात पुन्हा अशी घटना घडता नये, याची खबरदारी प्रशासनाने व सरकारने घेतली पाहिजे.