

श्रावण : कणकवली-आचरा मार्गावर रविवारी 22 फेब्रु. रोजी आडवली-भटवाडी येथील तीव्र वळणावर कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी पलटी होऊन पाच पैकी तिघेजण जखमी झाले. दरम्यान पलटी झालेली कार तेथील रहिवासी अतुल मंगेश राणे यांच्या शेतमांगरावर आदळल्याने शेतमांगराचेही मोठे नुकसान झाले. भटवाडी पोलिस पाटील सचिन लाड यांनी सहकाऱ्यांसोबत अपघात स्थळी धाव घेऊन सहकार्य केले.
कोल्हापूर येथील 5 पर्यटक कारने कणकवली-आचरा मार्गाने तोंडवली येथे जात होते. आडवली-भटवाडी येथे तीव्र वळणाचा चालकाला अंदाज न आल्याने भरधाव कार अनियंत्रित होवून पलटी झाली. रविवारी सायंकाळी 5 वा. सुमारास हा अपघात झाला. आडवली-भटवाडी येथील हे वळण फार तीव्र आणि धोकादायक आहे. याच वळणावर पाच वर्षांपूर्वी टेम्पो पलटी होऊन एका व्यक्तीचा मृत्यु झाला होता. तसेच येथे सातत्याने किरकोळही अपघात होत असतात. या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने धोक्याची सुचना देणारा फलक लावावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.