

सिंधुदुर्ग : 'टीडब्ल्यूजे लर्निंग सोल्यूशन्स' या कंपनीत गुंतवणूक केल्यास तीन ते पाच टक्के परतावा देण्याचे, तसेच १२ महिन्यांनंतर मूळ गुंतवणूक परत करण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची २ कोटी ५३ लाख ८७ हजार ३३९ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
समीर सुभाष नार्वेकर (३६), नेहा समीर नार्वेकर (३६, दोघेही, गिमवी, ता. गुहागर, जि. रत्नागिरी) आणि अमित विश्वनाथ बालम (३८, रा. कसाल, ता. कुडाळ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी सांगितले की, वीणा नितीन लकडे (४१, रा. पुईखडी, राधानगरी रोड, कोल्हापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून १९ मे २०२६ रोजी गुन्हा दाखल झाला होता. सुरुवातीला फिर्यादीसह अन्य नऊ गुंतवणूकदारांची मिळून ६४ लाख ९८ हजार ८९७ रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या कंपनीमध्ये गुंतवणूक करून फसवणूक झालेल्या अन्य गुंतवणूकदारांनीही पुढे येऊन तक्रारी कराव्यात असे आवाहन केले होते. त्यानंतर आणखी गुंतवणूकदारांनी तक्रारी केल्याने या प्रकरणातील आर्थिक गैरव्यवहाराची व्याप्ती वाढल्याचे पोलिस तपासातून स्पष्ट झाले आहे.
संबंधित कंपनीमध्ये गुंतवणूकदारांनी एकूण ३ कोटी ९२ लाख ६० हजार रुपये गुंतविल्याचे समोर आले आहे. त्यापैकी १ कोटी ३८ लाख ७२ हजार ६६१ रुपये परतावा देण्यात आला. मात्र २ कोटी ५३ लाख ८७ हजार ३३९ रुपये परत न केल्याने एवढ्या रकमेची फसवणूक झाल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.सहा संशयित आरोपी आहेत. यातील तिघांना अटक झाली आहे, असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले. फिर्यादी वीणा लकडे यांनी एप्रिल २०२३ ते २१ मार्च २०२५ या कालावधीत बँकेमार्फत कंपनीत १७ लाख रुपये गुंतवले. आश्वासनानुसार परतावा तसेच मुदत पूर्ण झाल्यानंतर मूळ रक्कम परत करण्यात आली नाही. मार्च २०२५ पासून परतावा बंद करून आर्थिक फसवणूक केली. यामुळे लकडे यांनी पोलिसांत धाव घेतली. याबाबत पोलिस कसून तपास करीत आहे.