

निर्णय राऊत
आंबोली : येत्या गुरुवारी (दि. १३) श्रावण मासाला प्रारंभ होत असल्याने आजचा (रविवार) दिवस आंबोली वर्षा पर्यटन हंगामाचा अंतिम 'वीकेंड' आहे. यामुळे निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी शुक्रवारपासूनच हजारो पर्यटक आंबोलीत दाखल झाले आहेत. पर्यटकांच्या या प्रचंड गर्दीमुळे परिसरातील सर्व हॉटेल्स आणि होम-स्टे आगाऊ बुकिंगने पूर्णतः 'हाऊसफुल्ल' झाले आहेत.
शनिवारी पूर्वआरक्षणाविना आंबोलीत आलेल्या अनेक पर्यटकांची मोठी गैरसोय झाली. त्यांना साधी रूम मिळणेही कठीण झाल्याने, निदान एक रात्र निवाऱ्यासाठी मिळावी म्हणून ते स्थानिकांच्या घरात आसरा शोधत असल्याचे चित्र होते. आज पर्यटन हंगामाचा शेवटचा रविवार असल्याने आंबोलीत तब्बल १ लाखांवर पर्यटक दाखल होऊन विक्रमी गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पर्यटकांच्या या अलोट गर्दीमुळे आंबोली घाटमार्गासह पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या सर्वच मार्गांवर मोठी वाहतूक कोंडी निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.
गेल्या काही वर्षांत आंबोलीच्या वर्षा पर्यटनाची क्रेझ प्रचंड वाढली आहे. यंदाच्या हंगामात, गेल्या दीड महिन्यातच लाखो पर्यटकांनी आंबोलीला भेट देऊन इथल्या मनमोहक निसर्गाचा आणि धबधब्यांचा आनंद लुटला आहे. श्रावण महिना सुरू झाल्यानंतर वर्षा पर्यटनाचा हंगाम अधिकृतपणे संपत. त्यामुळे या शेवटच्या वीकेंडला पर्यटकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने वाहतूक नियोजनासाठी चोख व्यवस्था करणे अत्यंत आवश्यक बनले आहे.