कुडाळ : गेले दोन दिवस कोसळलेल्या अवकाळी पावसाने भातपिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. हळव्या भातपिकाला मोठ्या प्रमाणात पावसाचा तडाखा बसला आहे. भात कापणी सुरू असतानाच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने कुडाळ तालुक्यासह जिल्हाभरात भातपीक धोक्यात आले आहे. उभे भातपीक जमीनदोस्त झाले असून, सततच्या पावसाने या भाताला कोंब येऊन, नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. कापणी केलेले भातही पावसात भिजून नुकसान झाले. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास डोळ्यांदेखत नुकसान होत असल्याचे पाहताना शेतकरी हतबल होत आहेत.
जिल्हाभरात गेले दोन दिवस मोठ्या प्रमाणात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळत आहे. गुरुवारी सकाळपासून पावसाने सुरुवात केली होती. या पावसाचा सर्वाधिक फटका भात पिकाला बसला आहे. भात पीक कापणीयोग्य बनले असून, बहुतांशी ठिकाणी भातकापणी जोरात सुरू आहे. त्यातच पावसाने हजेरी लावल्याने भातशेतीचे नुकसान झाले आहे. हुमरमळा, पणदूर, डिगस, कडावल, पावशी, कुडाळ, साळगाव, माणगाव, नेरूर, तेंडोली, सरंबळ आदी पंचक्रोशीत तसेच अन्य भागात उभे भातपिक जमीनदोस्त झाले आहे. पिकलेले भात जमिनीवर पडल्याने या भाताला कोंब येण्याची भीती आहे.गेल्या चार दिवसांत कापणी करून वाळत घातले भात व गवताचे भिजून नुकसान झाले.
पावसाळ्यात अतिवृष्टी, पूर तसेच अवकाळी पाऊस यामुळे सतत शेतकर्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत े. यंदा पावसाळ्यात पुराच्या तडाख्याने शेतीचे मोठे नुकसान झाले होते. दुबार पेरणी व लावणी करण्याची वेळ शेतकर्यांवर आली होती. यात वाचलेली भातशेती आता कापणी योग्य बनली असतानाच पुन्हा पावसाने नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग संकटात सापडला आहे.