

कणकवली : सिंधुदुर्गात गुरुवारपासून सातत्याने वळवाचा पाऊस पडत आहे. शनिवारी तिसर्या दिवशीही पावसासोबतच वादळी वार्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. त्यामुळे घरे तसेच विद्युत वाहिन्यांचे नुकसान झाले. काही ठिकाणी रस्त्यांवर झाडे पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली. वैभववाडी, कणकवली, कुडाळ व सावंतवाडी तालुक्यातील अनेक भागात सायंकाळी वादळी वार्यासह पाऊस झाला. सलग तिसर्या दिवशी वळवाच्या पावसाने हॅट्ट्रिक करत नागरिकांना त्रस्त केले. पावसामुळे आंबा, काजूसह जांभूळ आणि रतांबा फळ पिकांवरही परिणाम झाला आहे. त्यातच लग्नसराई व विविध कार्यक्रम सुरू असल्याने उत्साहावर विरजण पडत आहे.
शनिवारी सकाळपासूनच उष्म्याचे प्रमाण वाढले होते. दुपारी ४ वा. च्या सुमारास विजांचा गडगडाट आणि वादळी वार्यांसह सरी कोसळू लागल्या. कणकवली शहरातील भर बाजारपेठेत असलेल्या जुन्या पिंपळ वृक्षाची फांदी तुटून ती रस्त्यावर कोसळली. रहदारीच्या वेळेतच फांदी मोडून पडल्याने भीती निर्माण झाली. सुदैवाने कोणालाही इजा पोहोचली नाही. मात्र त्यामुळे काही काळ बाजारपेठेतील वाहतूक बंद झाली होती. शहरातील टेंबवाडी तसेच तहसील कार्यालय परिसरात झाडे मोडून पडल्याने नुकसान झाले. कणकवली तालुक्यातील खारेपाटण, तळेरे-नांदगाव, साकेडी, नागवे, चिंचवले, हरकुळ बुद्रुक आदी भागात वादळी वार्यामुळे झाडे पडून घरांचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी घरे तसेच अंगणांच्या छप्परांचे पत्रे वादळी वार्याने उडून गेल्याने नुकसान झाले.
वैभववाडी तालुक्याच्या काही भागात चक्रीवादळसदृश परिस्थिती निर्माण झाली. आखवणे भोम पुनर्वसन गावठाणाला या वादळाचा सर्वाधिक फटका बसला. अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडे मोडून पडल्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती, तर वीज वाहिन्यांवर झाडे पडल्यामुळे काही गावांत वीजपुरवठा खंडित झाला. मांगवली, तिथवली, कुंभवडे गावांतही वादळी वार्यामुळे झाडे पडून घरे, विद्युत वाहिन्या यांचे नुकसान झाले तर काही ठिकाणी रस्त्यावर झाडे पडून वाहतूक बंद झाली होती.
कुडाळ तालुक्यात शनिवारी सायंकाळी वादळी वाऱ्याने भडगाव बुद्रूक येथील अनिल कदम यांच्या घरावर माड पडून मोठे नुकसान झाले. हिर्लोक प्रा. आ. केंद्र परिसरात वादळाने झाडे मोडून पडली. अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडे पडल्याने त्याचा वाहतुकीवर परिणाम झाला. सावंतवाडी शहर आणि परिसरात पावसाचा जोर कायम असून शनिवारी सलग तिसऱ्या दिवशी पावसाने धुवाँधार हजेरी लावली.
आंबा, काजू सोबत जांभूळ, कोकम पिकावर परिणाम
सिंधुदुर्गात सध्या आंबा, काजू फळपिकासह जांभूळ व कोकमचाही हंगाम सूरू आहे. एकीकडे जिल्ह्यात यावर्षी आंबा व काजू पीक कमी प्रमाणावर आले होते. त्यातच अखेरच्या टप्प्यात ग्रामीण भागातून आंबा व काजूची आवक वाढली होती. मात्र पावसामुळे या फळांचे नुकसान होणार आहे. त्याचबरोबर जांभूळ आणि कोकमवरही संकट निर्माण झाले आहे.