

दोडामार्ग : मागील सहा दिवसांपासून जंगलात वावरणार्या हत्तींनी त्यांचा मोर्चा कोलझर गावाकडे वळविला. येथील फळबागायतीत घुसून शेतकर्यांच्या नारळ व केळी बागायतीचे अतोनात नुकसान केले. यात शेतकरी अनिल देसाई, रुपेश वेटे, मेघशाम देसाई, श्रीधर देसाई या शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
तळकट पंचक्रोशीत सहा हत्तींचा कळप वावरत आहे. मागील सहा दिवसांपासून या हत्तींचा वावर येथील जंगल परिसरात होता.
सतत पडणार्या पावसामुळे या हत्तींचा मागोवा काढण्यातही वन विभागाने नेमलेल्या पथकाला यश मिळत नव्हते. हे हत्ती शनिवारी पहाटेच्या सुमारास कोलझर परिसरात दाखल झाले. येथील शेतकर्यांच्या फळबागायतीत घुसून माड उद्ध्वस्त केले. केळींचा फडशा पाडला. त्यामुळे शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या परिसरात हत्तींचा वाढता वावर पाहून शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.