

देवगड : देवगड तालुक्यात गुरुवारी सायंकाळी अचानक आलेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने ग्रामीण भागाला झोडपून काढले. सकाळपासून जाणवणाऱ्या प्रचंड उष्म्यानंतर सायंकाळी झालेल्या या पावसाचा मोठा फटका फळबागांना बसला असून हापूस आंबा आणि काजू पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
गुरुवारी सकाळपासूनच तालुक्यात उन्हाचा कडाका आणि आर्द्रता वाढल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले होते. मात्र सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास वातावरणात अचानक बदल झाला. तालुक्यातील नारिंग्रे, मिठबांव, कातवण, तळेबाजार आणि शिरगांव परिसराला पावसाने अक्षरशः झोडपून काढले.
विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. अनेक ठिकाणी पावसासोबत मोठ्या गारा पडल्याने सर्वत्र पांढरी चादर पसरल्याचे चित्र पाहायला मिळाले.सध्या हापूस आंब्याचा हंगाम केवळ १० टक्के असतानाच या पावसाने घाला घातला आहे. गारांच्या मारामुळे तयार झालेला आंब्याचे नुकसान होणार आहे. पावसामुळे फळांवर डाग पडण्याची आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे आधीच आर्थिक संकटात असलेल्या बागायतदारांचे कंबरडे मोडले आहे.