
वैभववाडी : भुईबावडा घाटात सोमवारी (दि.23) सायंकाळी झालेल्या ढग फुटीने घाट रस्त्यांची दैना उडाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून घाटातील दरडी हाटविण्यात आल्या आहेत. त्यामुळे मंगळवारी (दि.24) सायंकाळपासून हलकी वाहतूक सूरू करण्यात आली आहे. मात्र मोरीचा पाईप वाहून गेल्यामुळे रस्त्याला भगदाड पडल्यामुळे घाटातून एसटी बससह अवजड वाहतूक 24 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर रात्री 12 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. सदर मार्गावरून हलक्या वाहनांची वाहतूक चालू राहील.असे या बद्दलचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. करूळ घाटही बंद असल्यामुळे या घाटातील वाहतूक फोंडाघाट व अनुस्कुरा घाट मार्गे वळवण्यात आली आहे.
घाटातील संरक्षक भिंतीच्या बाजूचा रस्त्याचा काही पृष्ठभाग मातीच्या भरावासह पूर्णतः वाहून गेला आहे. त्यामुळे रस्त्याला मोठे भगदाड पडले आहे. मोऱ्याच्या ठिकाणी असलेल्या दोन रांगांच्या पाईपपैकी एका रांगेचे पाईप काही भागात तुटून वाहून गेले असून हेडवॉल पूर्णपणे पडली आहे. या भागात आजही पाऊस सुरू असून पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात रस्त्यावरून जात आहे. मोरीच्या वरील बाजूला मोठ्या प्रमाणात दगड मातीचा ढीग जमा झाला आहे. रस्त्याचा पृष्ठभाग अस्तित्वात सुमारे २.७० मी. इतक्या रुंदीचा राहिला असल्याने या भागातून मोठी वाहने जाणे अपघाताला कारण ठरु शकण्याची शक्यता असल्याने सद्यस्थितीत या भागातून (घाटरस्त्यामधून) केवळ हलक्या स्वरूपाच्या प्रवासी वाहतूकीला परवानगी देऊन इतर वाहतूक फोंडाघाट मार्गे अथवा अनुस्कुरा घाट मार्गे वळविणेबाबत विनंती केलेली आहे.