

ST Buses For Wari
कणकवली : आषाढी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूर येथे विठूरायाच्या दर्शनासाठी येणार्या लाखो भाविकांच्या सेवेसाठी एसटीच्या 5,200 बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. या बसेस घेऊन येणारे चालक, वाहक, त्यांची देखभाल करणारी यांत्रिक कर्मचारी व या सर्वांना मार्गदर्शन करणारे पर्यवेक्षक व अधिकारी यांच्या चहा, नाष्टा व जेवणाची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
मंत्री सरनाईक म्हणाले, गेली कित्येक वर्षे विठूरायाच्या भक्तांची सेवा एसटी व एसटीचे कर्मचारी सातत्याने करत आहेत. ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता अतिशय निष्ठेने त्यांचे कर्तव्य ते बजावत असतात. आषाढी वारीच्या काळात त्यांच्या जेवणाची आबाळ होऊ नये म्हणून यंदा स्वखर्चाने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सलग तीन दिवस या सर्वांच्या चहा, नाष्टा व जेवणाची व्यवस्था (एकादशीला उपवासाचे पदार्थ) करण्यात आली आहे. यानिमित्ताने माणसातील विठूरायाची सेवा करण्याची संधी मला मिळत आहे. हे पुण्य पैशात मोजण्यासारखे नाही. त्यामुळे आपण दरवर्षी अशाप्रकारचा उपक्रम राबवणार असल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.
आषाढी वारीच्या काळात 5, 6 व 7 जुलै रोजी चंद्रभागा बसस्थानक, भिमा बसस्थानक, विठ्ठल बसस्थानक, पांडुरंग बसस्थानक येथे सुमारे 13 हजार एसटी कर्मचारी मोफत भोजन व्यवस्थेचा लाभ घेणार असल्याची माहिती सिंधुदुर्गचे विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी दिली.
-पंढरपूर वारीत कार्यरत असणार्या सुमारे 13 हजार एसटी कर्मचार्यांसाठी.
-चहा, नाश्ता आणि जेवण (एकादशीला उपवासाचे पदार्थ) पूर्णपणे मोफत.
-5, 6 आणि 7 जुलै रोजी चंद्रभागा, भिमा, विठ्ठल आणि पांडुरंग बसस्थानकांवर.
- या संपूर्ण व्यवस्थेचा खर्च मंत्री प्रताप सरनाईक वैयक्तिकरित्या उचलणार आहेत