

आंबोली : गेले चार दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे आंबोलीचा मुख्य धबधबा आता पूर्ण क्षमतेने कोसळू लागला आहे. याबरोबरच घाटमार्ग व परिसरातील सर्वच धबधबे प्रवाहित झाले आहेत. या पार्श्वभूमीवर ४ जुलै या पहिल्या शनिवारपासून आंबोलीच्या वर्षा पर्यटनास प्रारंभ होणार आहे. या वर्षी तब्बल महिनाभराच्या विलंबाने आंबोलीचे वर्षा पर्यटन सुरू होत आहे. आंबोलीतील वर्षा पर्यटनाची उत्सुकता देशभरातील पर्यटकांना असून, दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पर्यटकांची विक्रमी गर्दी होण्याचा अंदाज आहे.
फेसाळणारे धबधबे आणि धुक्याची दुलई अनुभवण्यासाठी पर्यटक सज्ज
नैसर्गिक सौंदर्य व जैवविविधतेसाठी आंबोली देशभरात प्रसिद्ध आहे. ६ जून रोजी मान्सून दाखल झाला तरी 'अल निनो'च्या प्रभावामुळे पावसाने ओढ दिली होती. परिणामी जून संपत आला तरी धबधबे प्रवाहित झाले नव्हते. यामुळे स्थानिक व्यावसायिक चिंतेत होते. मात्र, मागील दोन दिवसांपासून पावसाने दमदार पुनरागमन केल्याने मुख्य धबधब्यासह घाटमार्ग व परिसरातील सर्वच धबधबे पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाले आहेत. त्यामुळे पहिला वीकेन्ड आज शनिवारी येत असून या शनिवार, रविवारी आंबोलीत वर्षा पर्यटकांची गर्दी उसळणार आहे. आंबोलीतील पांढऱ्या शुभ्र फेसाळणाऱ्या धबधब्यांवर आंघोळ तसेच पावसात भिजल्यावर येथील टपरीवरचा गरमा गरम चहा, भाजलेली कणसे, वडापाव, साबुदाणा वडा, भजी आदी चाखण्याची मज्जा काही औरच असते. कावळेसाद पॉईंटवर शेकडो फूट खोल दरीत कोसळणारे धबधबे आणि वाऱ्यामुळे त्या धबधब्यांचे रिव्हर्स येणारे पाणी (रिव्हर्स वॉटरफॉल) ही निसर्गाची किमया येथे पाहणे रोमांचकारी असते.
आंबोलीतील मुख्य पर्यटन पाॅईंटस्
मुख्य धबधबा, सनसेट पॉईंट, शिरगावकर पॉईंट, कावळेसाद पॉईंट, नांगरतास धबधबा, राघवेश्वर-स्वयंभू गणपती मंदिर (हिरण्यकेशी नदीतील), चौकुळ-कुंभवडेतील बाबा धबधबा, हिरण्यकेशी नदीचा उगम.
आंबोलीत कसे याल?
आंबोली हे वेंगुर्ला-बेळगाव राज्य मार्गावर वसलेले असून येथे येण्यासाठी मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर, आजरा, गडहिंगलज, बेळगाव तसेच सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, मालवण, वेंगुर्ले, पणजी, मडगाव येथून थेट एसटी व खासगी आरामगाड्यांची सेवा उपलब्ध आहे.
जवळचे रेल्वे स्टेशन : सावंतवाडी रोड
जवळचे विमानतळ : गोवा (मोपा), सिंधुदुर्ग व बेळगाव.
मुंबई-आंबोली ४८० किमी. (मुंबई -पुणे -कोल्हापूर - आजरा मार्गे) व मुंबई - गोवा महामार्गाने - ५५० किमी. पुणे -आंबोली - ३४५ किमी, कोल्हापूर-आंबोली ११० किमी.