

कणकवली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन जानवली भूमीत भारतीय बौद्ध महासभेच्या मुंबई व जानवली शाखेने नव्याने लुंबिनीवन बुद्ध विहार बांधले आहे. या बुद्ध विहाराच्या माध्यमातून तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांच्या अनुयायांनी करावे, असे आवाहन भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष, समता सैनिक दलाचे कमांडर तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉ. भीमराव आंबेडकर यांनी केले.
जानवली गावातील लुंबिनीवन बुद्ध विहार लोकार्पण कार्यक्रमात डॉ. भीमराव आंबेडकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जानवली बौद्ध विकास संघाचे अध्यक्ष सुनील पवार, स्वागताध्यक्ष तथा जानवली सरपंच अजित पवार, भंते धम्मानंद, कश्यप, भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डेकर, उपसरपंच किशोर राणे, भारतीय बौद्ध महासभा महिला जिल्हाध्यक्षा प्रा. सुषमा हरकुळकर, तालुकाध्यक्ष भाई जाधव, पोलीस पाटील मोहन सावंत, माजी पोलीस पाटील पांडुरंग राणे, महिला तालुकाध्यक्षा आशाताई भोसले, डॉ. सतीश पवार, अॅड. मोहन राव, विश्वनाथ कदम, महासभेच्या प्रचार व पर्यटन विभाग सचिव दीपक कांबळे, संरक्षण विभागचे दिलीप तंरदळेकर, जिल्हा सरचिटणीस संजय पेंडुरकर, तालुका शाखेचे सचिव सुभाष जाधव, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर, भारतीय बौद्ध महासभा रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष अनंत सावंत आदी उपस्थित होते.
डॉ. भिमराव आंबेडकर म्हणाले, जानवली गावाला मोठा इतिहास आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन आहे. कोकणात मोठ्या धम्म परिषदा होत नाहीत, हा गैरसमज आहे. दोन महिन्यांपूर्वी रत्नागिरी जिल्हयात मोठी धम्म परिषद झाली. या परिषदेला मी उपस्थित होतोे. बुद्ध विहार लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करताना त्या कार्यक्रमाचे गांभीर्य समाजबांधवांना कळले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आरंभी बौद्ध समाजातील युवती व महिलांनी स्वागत गीत म्हटले. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
मान्यवरांचा परिचय प्रा. राहुल पावार यांनी करून दिला. सूत्रसंचालन नीलेश पवार यांनी केले. या कार्यक्रमाला बौद्ध बांधव व आंबेडकरांचे अनुयायी उपस्थित होते.
1938-1940 या कालखंडात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘महार परिषदा’ घेऊन समाजाला जागृत करण्याचे काम केले. या अंतर्गत डॉ. आंबेडकर यांनी 14 मे 1938 रोजी जानवली येथे ‘महार परिषद’ घेतली. या परिषदेचे अमृतमहोत्सवी वर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बौद्ध बांधव व बहुजनांनी साजरे केले.