कणकवली : आयनल गावच्या नळपाणी योजनेला गेला सव्वा महिना पाणी न आल्याने ग्रामस्थांनी मंगळवारी ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. 'कशासाठी कशासाठी घोटभर पिण्याच्या पाण्यासाठी' असे म्हणत आयनलमधील सुमारे ७० ते ८० नागरिक, महिला ग्रा.पं. वर मोर्चा काढण्यासाठी एकत्रित जमले होते. मात्र सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये मनाई आदेश लागू केल्याने मोर्चा न काढता नळ धारकांची सभा घेवून ग्रा.पं. ला निवेदन देण्यात आले. गेला महिनाभर नळयोजनेला पाणी नसताना ग्रामपंचायतीने कोणीतीच कार्यवाही न केल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त करत नळयोजना तातडीने सुरु करण्याची मागणी केली.
सरपंच सिद्धी दहीबावकर यांनी हे निवेदन स्विकारले. उपसरपंच श्री. हडकर, ग्रामपंचायत अधिकारी श्री. बोडेकर तसेच माजी सरपंच बापू फाटक, संतोष वायंगणकर, भालचंद्र साटम, सुनील ओटवकर, मनोहर पडवळ, अनिल ओटवकर, मोहन लोके, लबू चव्हाण, सहदेव ओटवकर, भास्कर लोके, विश्वास पडवळ, बाबू फाटक, सुशांत चव्हाण, तुषार वायंगणकर, बाळा मगम, रवींद्र पेडणेकर, वियज पेडणेकर, लक्ष्मण चव्हाण, अशोक ओटवकर, अंकिता मेस्त्री, लक्ष्मी फाटक, रंजिता चव्हाण, सारिका ओटवकर आदी उपस्थित होते.
गावातील नदीनाले, विहिरी पाण्याने तुडूंब भरलेल्या असताना फक्त नळयोजनेला पाणी न येणे ही शरमेची बाब आहे. गावातील काही वयोवृद्ध नागरिक घराच्या छपरावर पडणाऱ्या पाण्याने आपली गरज भागवत असून पाऊस गेल्यानंतर या नागरिकांनी जायचे कुठे? असा सवाल भालचंद्र साटम यांनी केला. गावातील नागरिकांना नियमित दररोज पाणी देणे हे ग्रामपंचायतीचे प्रथम कर्तव्य असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.