

आचरा : उदय बापर्डेकर
आचरा समुद्रकिनारी पिरावाडी येथील कासवमित्रांनी संवर्धन केलेल्या घरट्यातून बाहेर आलेल्या ऑलिव्ह रिडले या जातीच्या कासवाच्या पिल्लांना वनविभाग अधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणप्रेमी कासव मित्र सूर्यकांत धुरी यांनी संवर्धन केलेल्या कासवाच्या अंड्यातून जन्मलेल्या ११० कासव पिल्लांना समुद्रात सोडण्यात आले. अंगणवाडीतील मुलांच्या हस्ते आज (मंगळवार) सकाळी समुद्री अधिवासात सोडण्यात आले. आचरा ते तोंडवळी, तळाशील या समुद्र किनारी भागात कासव मोठ्या संख्येने दाखल होत आहेत.(Olive Ridley Turtle)
यावेळी कांदळगाव येथील वनरक्षक संजीव जाधव, सूर्यकांत धुरी, नितांत कुबल, केशव कुबल, पोलीस पाटील तन्वी जोशी, जगन्नाथ जोशी, पिरावाडी येथील अंगणवाडी मदतनीस श्रावी परडकर, सृष्टी धुरी, पिरावाडी येथील अंगणवाडीचे बाल विद्यार्थी, मच्छिमार बांधव उपस्थित होते.
सुर्यकांत धुरी यांनी सरकारी नियमाप्रमाणे कासवांच्या अंड्यांचे संवर्धन करत बुधवारी ५१ दिवसांनी त्या अंड्यांपासुन बाहेर पडलेल्या 110 पिल्लांची बॅच आचरा समुद्रात सोडली. आचरा पिरावाडी येथील समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात ऑलिव्ह रिडले कासवांची अंडी सापडून आली होती. या वर्षाच्या सुरुवाती पासून कासव संवर्धनास वेग आला असून, तब्ब्ल 28 घरटी आचरा किनाऱ्यावर तयार करण्यात आली आहेत. यातील या बॅच टप्प्या टप्प्याने सोडण्यात येणार आहेत. ही कासवाची अंडी वनविभागाच्या देखरेखीखाली दोन महिन्यांपूर्वीपासून समुद्र किनारी संरक्षित करण्याचे काम कासव मित्रानी हाती घेतले आहे. आचरा ते तोंडवळी या समुद्र किनारी भागात कासव मोठ्या संख्येने दाखल होत असून या किनाऱ्यांना पसंती देत आहेत.
अॕलिव्ह रिडले ह्या कासव जमातीची कासवे या किनाऱ्यास पसंती देताना दिसत आहेत. आचरा ते तळाशील कासवांच्या अंडी घालण्याचा किनारा म्हणून अलीकडच्या काळात ओळखला जाऊ लागला आहे. या भागातील ग्रामस्थ ही अंडी सुरक्षित ठेऊन अन्य हिंस्त्र प्राण्यांपासून त्यांचे जतन करत आहेत. दोन महिन्यानंतर पिल्ले बाहेर पडली की वनाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली समुद्रात सोडत आहेत.