

चिपळूण : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील येलोंदेवाडी लघुपाटबंधारे प्रकल्पातील ती ११० कुटुंबे बुडीत क्षेत्राबाहेर असल्याचा दावा पाटबंधारे विभागाने केला आहे. पाटबंधारे विभाग उपअभियंता विपुल खोत यांनी ही माहिती दिली असून येलोंदेवाडी धरण प्रकल्प पूर्ण झाल्याचेदेखील त्यांनी स्पष्ट केले.
तालुक्यातील शिरवली, देवखेरकी, नारदखेरकी, येलोंदेवाडी या तीन गावातील १४२ हेक्टर जमीन येलोंदेवाडी धरण प्रकल्पासाठी शासनाने भूसंपादित केली. या धरणाची लांबी ७०० मी., उंची ४५ मी. असून यावर्षी सुरुवातीच्या काळात झालेल्या पावसामुळे धरणामध्ये १५.२६ दशलक्ष घनमीटर पाण्याची साठवण झाली आहे.
सन २००७ मध्ये या धरणाच्या कामासाठी निविदा काढण्यात आली होती. २०१८ ते २०२६ या कालावधीत हे काम पूर्ण झाले आहे. देवखेरकीमधील ४७, शिरवली येलोंदेवाडी येथील ८२ अशा एकूण १२९ जणांचे स्वेच्छा पुनर्वसन झाले आहे. या धरणाला भूसंपादनासह २२५ कोटी रुपयांचा खर्च आला आहे.
सद्यस्थितीत देवखेरकी येथील ती ११० घरे धरणाच्या बुडीत क्षेत्राबाहेर असल्याचे पाटबंधारे विभागाचे म्हणणे आहे. मात्र, या लोकांनी पुनर्वसन करावे अशी आग्रही मागणी केली. पाणलोट क्षेत्राबाहेर धरणाचे पाणी आल्यास आमची घरे विस्थापित होतील, अशी भीती व्यक्त करून शासनाने आम्हाला नुकसानभरपाई द्यावी व स्वेच्छा पुनर्वसनाचा पर्याय खुला करावा अशी मागणी येथील ग्रामस्थांची आहे.
धरणग्रस्त देवखेरकी सुतारवाडी व शिरवली गावासाठी स्वतंत्र पाणी योजना केली आहे. नुकत्याच पंचायत समिती गटविकास अधिकारी उमा घारगे-पाटील यांनी भेट दिली व जुनी पाणीपुरवठा योजना दुरुस्ती संदर्भात सूचना दिल्या आहेत. तसेच पाटबंधारे विभागाने गावात येण्या-जाण्यासाठी डांबरी रस्ते तयार केले आहेत. येलोंदेवाडीसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना हवी आहे. या धरणामुळे परिसरातील भूजल पातळी वाढणार आहे, असे पाटबंधारे विभागाचे उपअभियंता खोत यांनी स्पष्ट केले आहे.