
खेड : उध्दव ठाकरेंना ग्रामपंचायतीचा अभ्यास नाही, ते बजेट काय सांगणार? असा टोला शिवसेना नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. मंगळवारी (दि.११) खेड मध्ये पत्रकारांसोबत बोलताना कदम यांनी ठाकरेंवर टीका केली आहे.
बजेटच्या मुद्यावरुन रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना ठाकरेंनी किती निधी दिला? हे ते सांगू शकत नाहीत. उध्दव ठाकरेंना ग्रामपंचायतीचा अभ्यास नाही, ते बजेट काय सांगणार? उध्दव ठाकरेंना आता टीका करण्याचेच काम आहे. ते भविष्यात कधीच सत्तेत येणार नाहीत. केलेल्या कर्माची फळं उध्दव ठाकरेंना भोगावी लागतील. टीका करण्याचा उद्धव ठाकरेंचा धंदा सुरु राहुदेत.
बजेट डोळ्यासमोर ठेऊन योजना राबवाव्या लागतात. लाडकी बहीण योजना बंद केली तर दुसऱ्या योजना सुरु करता येतील असंही रामदास कदम म्हणाले. अंथरुण पाहून पाय पसरावे लागतात, असेही रामदास कदम यांनी म्हटलं आहे.
भैय्याजी जोशी यांनी मराठी भाषेबाबत केलेल्या वक्तव्याशी मी सहमत नसल्याचे रामदास कदम म्हणाले. कर्नाटकमध्ये जाऊन मराठी किंवा हिंदी बोलून दाखवा असंही ते म्हणाले. तिथे बोलता येत नसेल तर मुंबईत इतर भाषा का? असा खडा सवाल रामदास कदम यांनी केला.