

रत्नागिरी : माजी खासदार विनायक राऊत यांचा घरातला विषय आहे. त्यांनी याविषयी स्वत: स्पष्टीकरण दिले आहे. त्यांचा घरगुती विषय कोर्टामध्ये असून मी याविषयी राजकीय भांडवल करू इच्छित नाही. माझ्यावर आई-वडील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संस्कार आहेत. त्यांच्या वैयक्तिक मॅटरमध्ये जाऊन मला काहीही टीकाटिप्पणी करायची नाही. याबाबत पोलिस, कोर्ट निर्णय घेतील, असे मत पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले. आदर्श शिक्षक पुरस्काराच्या कार्यक्रमानिमित्त उद्योगमंत्री उदय सामंत सोमवारी जिल्हा दौऱ्यावर आले होते. या कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सामंत पुढे म्हणाले, लाडकी बहीण योजनेतून कोट्यवधी महिलांना लाभ मिळाला आहे. काही ठिकाणी अनवधानाने नोकरी करणाऱ्या महिलांचे अर्ज भरले गेले, तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केले होते. आक्षेप असणारी नावे वगळण्यात आली आहेत. मात्र किती लाडक्या बहिणींना लाभ नाही, किती नावे वगळली यावरच जास्त चर्चा सुरू आहे. ही विरोधकांची वेगळी स्टाईल आहे.
पाकिस्तानच्या हशतवाद्याबरोबर संबंध असलेल्या काहीजणांना अटक करण्यात आली आहे. कोणताही प्रसंग न होता पोलिसांनी त्या व्यक्तींना ताब्यात घेतले आहे. त्या १० जणांकडून सखोल चौकशी करून योग्य ती माहिती बाहेर येईल. योग्य सुरक्षा देशासाठी व महाराष्ट्रासाठी पोलिस दल देईल, असेही सामंत यांनी सांगितले.
अमीर खानबद्दल मंत्री नितेश राणे यांनी जे भाष्य केले आहे ते त्यांचे वैयक्तिक भाष्य आहे. ते योग्य आहे की अयोग्य आहे हे राणेच सांगतील. मी यावर बोलू इच्छित नाही. कुणाच्या वैयक्तिक आयुष्यात मी डोकावत नाही. यावर राजकारण करत नाही, असेही सामंत यांनी सांगितले.
हिंदुत्व उशिरा सुचलेले शहाणपण
जसे १६ दिवसांनी त्यांनी दिल्लीला पाठिंबा दिला तसेच काँग्रेससोबत राहून हिंदुत्व उशिरा सुचलेले शहाणपण आहे. राम मंदिर बांधू नये म्हणून काँग्रेसच्या मांडीवर बसणारे ही लोकं आहेत. तुम्ही आता हिंदुत्व काय शिकवता? असा प्रश्न पालकमंत्री सामंत यांनी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता उपस्थित केला.