

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यासह राज्यात शिवसेनेचे सर्वाधिक जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य विजयी झाले असून, शिवसेना नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिनी ही शिवसैनिकांकडून भेट असल्याचे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनामुळे आपण विजयोत्सव साजरा करणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात शिवसेनेचा जिल्हा परिषदेवर अध्यक्ष आणि नऊही पंचायत समित्यांवर सभापती बसणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यात सर्वाधिक जागा शिवसेनेला मिळाल्या असून 41 जागांवर विजय मिळवला आहे. तर भाजपा चार, राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्षाला पाच, शिवसेना उबाठाला 5 तर मनसेने एका जागेवर विजय मिळवला असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात शिवसेनेने 46 जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यात 41 विजयी झाले त्यामुळे जवळपास 90 टक्के विजयी स्ट्राईक रेट राहिला आहे.
जिल्ह्यातील नऊ पंचायत समित्यांमध्येही शिवसेनेने आघाडी घेतली आहे. 112 जागांपैकी 74 जागी शिवसेना, 14 जागांवर भाजप, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला 13, उबाठाला 11 तर अन्य 2 उमेदवार विजयी झाले आहेत. जिल्ह्यात नऊही पंचायत समित्यांमध्ये शिवसेनेचे सभापती बसतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राज्यात जिल्हा परिषदेला तिनशे उमेदवार उभे होते. त्यात 160 उमेदवार विजयी झाले आहेत. 53 टक्के विजयाचा स्ट्राईक रेट राहिला असल्याचे ना. सामंत यांनी सांगितले.