रत्नागिरीत श्री श्री रविशंकर यांचा आज भक्ती उत्सव

गोगटे-जोगळेकरच्या क्रीडांगणावर होणार महासत्संग सोहळा
Sri Sri Ravi Shankar
रत्नागिरीत श्री श्री रविशंकर यांचा आज भक्ती उत्सव
Published on
Updated on

रत्नागिरी : कोकणची सांस्कृतिक राजधानी असलेल्या रत्नागिरी नगरीत लवकरच एक ऐतिहासिक आध्यात्मिक सोहळा संपन्न होणार आहे. जागतिक स्तरावर शांततेचा संदेश देणारे आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचे गुरुवारी (दि. 22) रत्नागिरीत आगमन होत आहे. या खास भेटीच्या निमित्ताने शहरातील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या विस्तीर्ण मैदानावर सायंकाळी 6 वाजता भव्य भक्ती उत्सव आयोजित करण्यात आला आहे.

रोजच्या धकाधकीच्या जीवनात वेगवेगळ्या प्रकारचे ताणतणाव वाढत आहे. या डीजिटल युगात मनुष्य सुखी, समाधानी आयुष्य जगणे दुर्मीळ होत जात असताना या धकाधकीच्या जीवनात मन आनंदी राहण्यासाठी मनापासून हसणे जीवनात फार महत्त्वाचे असल्याचे जगाला संदेश देणारे सुदर्शन क्रिया याचे प्रणेते परमपूज्य श्री श्री रविशंकर यांचे मार्गदर्शन कोकणवासीयांना अनुभवता येणार आहे.

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कोर्सेस मध्ये माणसाचे मन अधिकाधिक संतुलित शांत व एकाग्र व्हावे त्यासाठीचे सामर्थ्य यावे व मन जास्तीत जास्त वर्तमान क्षणात राहून उत्तम प्रकारे काम करता यावे यासाठी अतिशय प्रभावी परिणामकारक गुरुकिल्ली दिली जाते. अनेक वैशिष्ट्यपूर्ण तंत्रांद्वारे क्षणोक्षणी बेचैन होणाऱ्या, पुढे पुढे धावणाऱ्या मनाला नियंत्रित केले जाते. हे सगळे श्वासाच्या तंत्रावर आधारित आहे. श्वासाचा शरीर मन व भावना आणि उत्साह यांचा जवळचा संबंध आहे. सुयोग्य व सुनियंत्रित पद्धतीने श्वास घेऊन केवळ आपले आरोग्यच नव्हे तर संपूर्ण जीवन सुधारता येते हे आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये शिकवले जाते. सहज सुंदर प्राणायाम नैसर्गिक सुलभ व अतिशय प्रभावी अशी सुदर्शन क्रिया सहज सुंदर ध्यान यामुळे आपल्या विचारांना उत्तम व सकारात्मक फायदा होतो. गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी गेल्या अनेक दशकांपासून भारतीय संस्कृतीतील योग, ध्यान आणि प्राणायाम या मूल्यांचा प्रचार करून जगभरातील मानवाला तणावमुक्त आणि निर्भय बनवण्याचे कार्य केले आहे.

विशेषतः त्यांच्या सुदर्शन क्रिया या क्रांतिकारी शोधामुळे जगातील 180 देशांमधील कोट्यवधी लोकांच्या जीवनात हास्य आणि आनंद परतला आहे. केवळ आध्यात्मिकच नव्हे, तर जागतिक शांततेचे दूत म्हणून त्यांनी अनेक देशांमधील युद्धजन्य परिस्थिती आणि संघर्षाच्या काळात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. राममंदिरासारख्या जटिल प्रश्नांतही त्यांनी घेतलेला पुढाकार महत्त्वपूर्ण ठरला आहे. अशा या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे पाऊल रत्नागिरीच्या भूमीला लागणार असल्याने संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे. हा भक्ती उत्सव म्हणजे केवळ एक व्याख्यान नसून, तो ज्ञान, ध्यान आणि सुश्राव्य भजन-सत्संगाचा एक अनोखा त्रिवेणी संगम असणार आहे. प्रत्यक्ष गुरुदेवांच्या उपस्थितीत सामूहिक ध्यान करण्याची संधी रत्नागिरीकरांना मिळणार असून, हा अनुभव प्रत्येकाच्या आयुष्यात नवी ऊर्जा देणारा ठरेल.

रत्नागिरी ही निसर्गसंपन्न आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध भूमी आहे. गुरुदेवांच्या आगमनामुळे या भूमीच्या आध्यात्मिक महत्त्वामध्ये मोलाची भर पडणार आहे. या सोहळ्याच्या यशस्वी नियोजनासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगची मोठी टीम अहोरात्र मेहनत घेत आहे. 15000 ते 20000 नागरिक रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा तसेच कोल्हापूर, पुणे, मुंबई, सांगली सातारा या शहरांतून देखील येणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news