

रत्नागिरी : जिल्ह्यातील विविध भागांत बिबट्याचा वावर वाढत असल्याचे समोर आले आहे. स्थानिक ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी आणि सोशल मीडियावरील व्हिडीओंच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या तक्रारींची वन विभागाने गांभीर्याने दखल घेतली आहे. वन विभागाने प्रत्यक्ष जागेवर जाऊन खात्री केल्यानंतर, ज्या गावांमध्ये बिबट्या दृष्टीस पडला आहे किंवा त्याचा वावर आहे, अशा गावांची अधिकृत यादी रत्नागिरी वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये 105 गावांचा समावेश असून रत्नागिरी तालुक्यात सर्वांत जास्त गावांचा समावेश आहे. यामुळे गावासह रत्नागिरी शहरातही बिबट्याची दहशत पसरली आहे.
रत्नागिरी वनपरिक्षेत्रामध्ये रत्नागिरी, लांजा, राजापूर, संगमेश्वर या तालुकांच्या समावेश आहे. या तालुक्यांमध्ये सध्या बिबट्यांची प्रचंड दहशत आहे. परिक्षेत्रात साधारण 100 ते सव्वाशे बिबटे असण्याची शक्यता वन विभागाने वर्तविली आहे. एवढेच नव्हे तर त्यांचा जंगलातील अधिवास सुमारे आठ ते दहा किमीचा असतो. परंतु बिबट्यांची संख्या वाढल्याने त्यांचा अधिवास घटला असून तो आता 5 किमीच्या दरम्यान आला आहे, असे वन विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे जंगलातील अन्न साखळी मजबूत झाल्याचे हे धोतक मानले जाते. त्यामुळे बिबटे आता भक्षाच्या शोधात थेट मानवी वस्तीमध्ये शिरत आहे आणि त्याचे हे प्रमाण वाढत आहे. वारंवार कुत्र्यांवर, जनावरांवर आणि कधी कधी माणसांवरही हल्ले झाल्याच्या घटना सुरूच आहेत. त्यामुळे बिबट्याची या भागांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.
रत्नागिरी परिक्षेत्र वन अधिकाऱ्यांनी बिबट्याचा वावर असलेल्या गावांची नावे जाहीर केली आहेत. त्यामध्ये राजापूर तालुक्यात पेंडखळे, सागवे, केरवण, भू, भानवली, नाटे, तुळसवडे, शिवणे, वडदहसोळ, कोंड्ये, ओणी, वाटूळ, आडिवरे, ताम्हाणे. रत्नागिरी तालुक्यात जाकादेवी परिसर, जयगड, सांडेलवण, कोतवडे, करबुडे, हातखंबा, फणसवळे, निवळी, पानवल, चाफेरी, कचरे, गणपतीपुळे, निवेंडी, भगवतीनगर, नेवरे, जाकादेवी, ओरी, वेतोशी, काळबादेवी, चाफे, उंडी, वरवडे, मालगुंड, भंडारपुळे, जांभरुण, भोके खानू, पाली, नाणीज, उंबरे, पावस, हरचेरी, टिके, टेंभ्ये, नाचणे, जुवे, कर्ला, फणसोप, कोळंबे, गोळप, गावखडी, मेर्वी, पूर्णगड, गावडेआंबेरे, दाभिल, आंजणारी, मावळंगे, हातिस, चिंचखरी, सोमेश्वर, वळके, केळवणे, चरवेली, कुवारबाव, मिरजोळे, शिरगाव, आडी, साखरतर, कासारवेली.लांजा परिसर- भडे, वनगुळे, गवाणे, हर्चे, पुनस, लांजा, धुंदरे, मठ, गोळवल, वडगाव, प्रभानवल्ली, विलवडे, हसोळ, आडवली, शिपोशी, वेरवली, खेरवसे, कोर्ले, शिरवली. संगमेश्वर क्षेत्रात-फुणगूस, कोसुंब, शिवणे, कुरधुंडा, सायले. आरवली परिसरात- कुंभारखाणी, राजिवली, राजवाडी, कडवई, धामणी, काजरी, साखरपा परिसराचा समवेश आहे.