

रत्नागिरी: शिक्षणसेवक योजनेतील शिक्षकांची एका पदावरून दुसऱ्या पदावर नियुक्ती झाली तरी आधीची सेवासुध्दा ग्राह्य धरली जाणार आहे. यामुळे त्यांना 3 वर्षे काम करण्याची अट रद्द झाली असून, आता दोनच वर्षे मानधन तत्वार काम करावे लागणार आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व 100 टक्के अनुदानित शाळांमधील शिक्षण सेवकांना हा नियम लागू असणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे लाखो शिक्षण सेवकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था तसेच 100 टक्के अनुदानित शाळांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षण सेवकांसाठी राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. शिक्षण सेवकांची एका पदावरून दुसऱ्या पदावर नवीन नियुक्ती झाली तरी त्यांच्या आधीच्या सेवेला ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यामुळे पूर्वी लागू असलेली तीन वर्षे मानधन तत्त्वावार काम करण्याची अट आता रद्द करण्यात आली असून आहे.
संबंधित शिक्षण सेवकांना केवळ दोन वर्षे मानधन तत्त्ववार सेवा बजावावी लागणार आहे. शासनाच्या या निर्णयाची अंमलबजावणी तत्काळ करण्यात येणार असून संबंधित आदेश जारी झाल्यानंतर सर्व नवीन नियुक्तींना हा नियम लागू होणार आहे. एका पदावरून दुसऱ्या पदावर नियुक्ती झाल्यास पुन्हा तीन वर्षे शिक्षण सेवक म्हणून काम करण्याची गरज राहणार नाही. यामुळे शिक्षकांच्या सेवेला योग्य न्याय मिळणार असल्याची भावना सेवकांमध्ये व्यक्त होत आहे.
सेवा स्थैर्य मिळण्यास मदत
शिक्षण सेवकांची बदली, पदोन्नती किंवा अन्य कारणाने दुसऱ्या पदावर नियुक्ती झाल्यास त्यांच्या आधीच्या सेवकालाच विचार केला जाणार आहे. त्यानुसार तीन वर्षाची अट रद्द करण्यात आली असून केवळ दोन वर्षे मानधन तत्वावर सेवा करणे आवश्यक राहणार आहे. नवीन नियुक्ती झाल्यानंतर संबंधित शिक्षण सेवकाने पूर्वी केलेली सेवा कालावधी ग्राह्य धरला जाणार आहे. त्यामुळे शिक्षकांना पुन्हा सुरूवातीपासून शिक्षण सेवक म्हणून सेवा करण्याची गरज उरणार नाही.