Ratnagiri : उड्डाणपुलाखालील रस्ते बनले पार्किंग झोन

मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांचा धोका वाढला
Ratnagiri News
उड्डाणपुलाखालील रस्ते बनले पार्किंग झोन
Published on
Updated on

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाखालून आजूबाजूच्या गावांसाठी काढण्यात आलेले पर्यायी मार्ग आणि काही ठिकाणचे रस्ते हे गेले काही महिने वाहनांसाठी पार्किंग झोन बनले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यापासून सुरू होणार्‍या महामार्गापासून राजापूरपर्यंत हीच परिस्थिती असून, बर्‍याचवेळा तेथे प्रदीर्घकाळ उभ्या असलेल्या वाहनांच्या गर्दीमुळे तेथून ये-जा करणार्‍या वाहनांना अडथळे ठरत असून त्यातून अपघातांचे धोके वाढत असतानाच कायदा सुव्यवस्था मात्र त्याकडे जातीनिशी लक्ष देत नसल्याने सखेद आश्यर्य व्यक्त होत आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील भरणे येथे उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. आंबवली व खेड शहर, दापोलीकडे जाण्यासाठी सर्व्हीस रोडवरून वाहने या उड्डाण पुलाखालून वळतात, तर राजापूर तालुक्याच्या कार्यक्षेत्रात वाटूळपासून पुढे येरडव फाटा, ओणी बाजारपेठ, राजापूर पेट्रोलपंप परिसर, हातिवले आदीठिकाणी उड्डाण पूल बांधण्यात आले असून त्याखालून आजूबाजूच्या गावांकडे दैनंदिन रहदारीसाठी कायमस्वरूपी मार्ग काढण्यात आले आहेत. मात्र त्या पुलांखाली बर्‍याचवेळा अनेक वाहने पार्क केली जात असून त्यामुळे वाहनांची मोठीं गर्दी तेथे पहायला मिळते.

खेड तालुक्यातील भरणे व राजापूरमधील ओणीमधील पाचल, येरडव फाट्यावर तर डंपर, ट्र्क यासह सर्वप्रकारची वाहने, तर प्रदीर्घकाळ उभी केलेली पहावयास मिळतात. खेड व राजापूर येथे काहीजण पुलाखालील जागेचा व्यवसायासाठीदेखील वापर करत आहेत. बर्‍याचवेळा तर काही मोठी वाहने तर एका रेषेत उभी असतात. त्यामुळे महामार्गावरुन किंवा आजुबाजुच्या परिसरातून आलेल्या वाहनाना वाहतुकीस अडथळे ठरत आहेत. या भागामध्ये अनेक लहान-मोठे अपघात झाले आहेत. वाहनचालकांच्या सुदैवाने फारसे नुकसान झाले नव्हते.काही वाहने तर गेले अनेक दिवस मालकीचे क्षेत्र असल्याप्रमाणे पुलाखाली उभी केली जात आहेत. खेड येथे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी कारवाई केली होती. मात्र पोलिस कारवाई थांबताच उड्डाणपूल म्हणजे विनापरवाना वाहन तळच बनविण्यात आला आहे. राजापूर पेट्रोल पंपाजवळच्या उड्डाणपुलाखालीही असेच प्रकार पहावयास मिळत आहेत. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर केवळ उड्डाणपुलच नाही तर जे पादचार्‍यांसाठी बोगदे काढण्यात आले आहेत त्याचाही वापर दुचाकी गाड्या पार्किंगसाठी केला जात आहे. .

महामार्गावरील उड्डाणपुलांसह काढलेल्या अंडर पास बोगद्यांचा वापर विनापरवाना वाहन तळासाठी होत असताना व वाहतुकीच्या दृष्टीने ते धोकादायक ठरत असताना त्या विरोधात कोणतीच कृती वा कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे जनमानसातून संताप व्यक्त केला जात आहे. एखादा मोठा अपघात झाल्यानंतरच कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे का, असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news