

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणाची दिशा ठरवणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या जाहीर प्रचाराचा गुरुवारी अधिकृतपणे शेवटचा दिवस आहे. गुरुवारी रात्री 10 वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार असल्याने शेवटच्या दिवशी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. जिल्ह्यात 56 ज्ाि.प. गट आणि 112 पंचायत समिती गणांसाठी शनिवारी मतदान होणार आहे.
गेल्या पंधरवड्यापासून सुरू असलेल्या या राजकीय रणधुमाळीचा समारोप गुरुवारी गावोगावी निघणाऱ्या पदयात्रा, रॅली आणि कोपरा सभांनी होणार आहे. या निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधक अशा दोघांसाठीही प्रतिष्ठेची लढाई निर्माण झाली आहे. जिल्ह्याच्या दुर्गम भागांपासून ते किनारपट्टीपर्यंतच्या सर्वच मतदारसंघांमध्ये उमेदवारांनी प्रचाराचा झंझावात निर्माण केला आहे. विकासाचे मुद्दे, रस्ते, पाणी आणि स्थानिक रोजगाराच्या आश्वासनांनी प्रचाराची राळ उडवून दिली आहे. गुरुवारी प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने राज्याचे उद्योगमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, राज्यमंत्री योगेशदादा कदम, आमदार किरणभैय्या सामंत, आमदार शेखर निकम, उबाठाचे आमदार भास्कर जाधव यांनी जिल्ह्यातील विविध जि.प. गटात दौरे ठेवले आहेत.
प्रत्येक गावात आणि वाडीवस्तीवर जाऊन मतदारांचे मन वळवण्याचा प्रयत्न आता सुरू राहणार आहे. प्रचाराची मुदत संपल्यानंतर डोअर टू डोअर म्हणजेच घरोघरी जाऊन भेटीगाठी घेण्यावर उमेदवारांचा भर राहणार आहे. मात्र, गुरुवारी रात्रीनंतर जाहीर प्रचारावर बंदी येणार असल्याने लाऊड स्पीकरचा आवाज शांत होईल.
जिल्ह्यातील मतदारांमध्येही या निवडणुकीबाबत मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. तरुण मतदारांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच जण उमेदवारांच्या आश्वासनांचे गणित मांडताना दिसत आहेत. उद्याचा दिवस हा प्रचाराचा क्लायमॅक्स ठरणार असून, रात्री दहा वाजल्यानंतर मतदारांना शांतपणे विचार करण्याची संधी मिळणार आहे. गुरुवारी होणाऱ्या या प्रचार सांगतेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून, त्यानंतर होणाऱ्या मतदानात रत्नागिरीकर कोणाच्या पारड्यात आपले मत टाकतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.