

रत्नागिरी : जिल्ह्यासह राज्यभरातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्यात आले होते. पहिल्या दिवशी दिलेल्या गणवेशाचा दर्जा तपासणीसाठी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. लवकरच जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या गणवेशाची तपासणी प्राथमिक शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी आणि केंद्रप्रमुख करणार आहेत. तसे परिपत्रक नुकतेच शासनाच्या वतीने काढण्यात आले आहे.
केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांमधील पहिली ते आठवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी गणवेशाचे वाटप करण्यात आले आहे. ते गणवेश हलक्या प्रतीचे असल्याच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे गणवेशाची तपासणी करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील विविध शाळेतील गणवेशाची तपासणी तीन अधिकारी करणार आहेत. विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी गणवेश मिळावा यासाठी शासनाकडून प्रति विद्यार्थी २४० रुपये दिल्याच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे शासनाने विद्यार्थ्यांना दिलेल्या गणवेशाची तपासणी करावी असे आदेश प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील विविध शाळेत वाटप करण्यात आलेल्या गणवेशाची आता तपासणी होणार आहे. तपासणीनंतर गणवेशाचा दर्जा कसा आहे, याविषयी शासनाकडे अहवाल पाठवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दिलेल्या मोफत गणवेशाचा कपडा तपासणीदरम्यान निकृष्ट आढळून आल्यास कापड पुरवठादार, शाळा व्यवस्थापन समिती यांच्यावर शिक्षणाधिकारी कारवाई करणार आहेत. तसे आदेश परिपत्रकात दिले आहेत.