

देवरुख : देवरुख - रत्नागिरी मार्गावर आंबव गावाच्या हद्दीत शुक्रवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास गवारेड्याच्या हल्ल्यात स्वप्निल जयराम पेडामकर (३८) साडवली सह्याद्रीनगर येथील तरुण गंभीर जखमी झाला होता. त्याचे सोमवारी उपचार सुरु असताना निधन झाले.
त्याच्यावर रत्नागिरीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर त्याला डेरवण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मृत्यूशी तो झुंज देत होता. सोमवारी ही झुंज अपयशी ठरली. उपचार सुरु असतानाच सोमवारी सायंकाळी ७.३० वाजता त्याची प्राणज्योत मालवली. स्वप्निलच्या अशा अपघाती निधनामुळे सह्याद्रीनगर परिसरावर शोककळा पसरली आहे.
स्वप्निलच्या पश्चात आई, एक भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. मंगळवारी सकाळी स्वप्नील याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दहीहंडी उत्सवाच्या तोंडावर गवा रेड्याच्या हल्ल्यात स्वप्नील जखमी झाल्याने सह्याद्री नगर मित्र मंडळाने आपला मोठा दहीहंडी उत्सव न करण्याचा निर्णय घेऊन स्वप्निलच्या उपचारासाठी मदत दिली होती. तीन दिवसाच्या झुंजीनंतर अखेर स्वप्निल ची प्राणज्योत मालवली. उमद्या वयात दुर्दैवी एक्झिट घ्यावी लागल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.