रत्नागिरी ः चक्राकार वार्याच्या प्रभावाने उत्तर कोकणापासून अरबी सगरालगत कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने पुढील दोन दिवसांत किनारपट्टी भागात हलका ते मध्यम स्वरूपाच्या अवकाळीच्या सरींचे सातत्य राहण्याची शक्यता हवमान विभागाने वर्तविली आहे. गेले दोन दिवस जिल्ह्यात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस झाला.
गुरुवारी सकाळीही हलक्या सरी पडल्या. वातावरण ढगाळ झाल्याने पाराही घसरला होता झाला. मात्र पुढील काही दिवस अवकाळीत सातत्य कायम राहणार असल्याने रत्नागिरी जिल्ह्यासह ठाणे, पालघर, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. गुरूवारी संपलेल्या 24 तासात जिल्ह्यात 5 मि.मी.च्यासरासरीने सुमारे 50 मि.मी. पाऊस झाला. गेले दोन दिवस रत्नागिरी तालुक्यासह, मंडणगड, खेड, चिपळूण, लांजा आणि राजापूर तालुक्यात अवकाळी पावसाच्या सरी कोसळत आहेत. राजापूर तालुक्यात 13 मि.मी.पेक्षा जास्त पाऊस झाला. जिल्ह्यात सरासरीपेक्षा 26 टक्के पाऊस जादा झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 4225 मि.मी.च्यासरासरीने तब्बल 38 हजार 200 मि. मी.ची मजल पावसाने गाठली आहे.
कोकणातील पाच जिल्ह्यांसह सातारा, कोल्हापूर, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, सांगली, जालना, बीड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, परभणी, बुलडाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.