

रत्नागिरी : शहरानजीकच्या भाट्ये येथील दर्गा स्टॉपजवळ शनिवार १५ ऑगस्ट रोजी सकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास दोन एसटींची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. अपघातात तब्बल दोन्ही एसटींमधील चालक, वाहक व प्रवासी मिळून एकूण २२ जण किरकोळ जखमी झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
याप्रकरणी एसटी चालक राजेंद्र शामराव कांबळे (३९, रा. एसटी बस डेपो राजापूर, रत्नागिरी) याच्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याविरोधात दुसऱ्या एसटीवरील चालक काशीनाथ भिकाजी भोसले (४५, रा. गोळप धोपटवाडी, रत्नागिरी) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, शनिवारी सकाळी ते आपल्या ताब्यातील एसटी (एमएच-१४-बीटी-२२३६) घेऊन रत्नागिरी ते पावस असे जात होते. त्याच सुमारास राजेंद्र कांबळे हा आपल्या ताब्यातील एसटी बस (एमएच-४०-एन-९७४२) भरधाव वेगाने घेऊन पावस ते रत्नागिरी जात होता.
...अन् एसटीचा ताबा सुटला
या दोन्ही एसटी बसेस भाट्ये येथील दर्गा स्टॉपजवळील वळणावर आल्या असता राजेंद्र कांबळेचा आपल्या एसटीवरील ताबा सुटला आणि त्याने रस्त्याच्या विरुद्ध दिशेला जात समोरुन येणाऱ्या एसटीला धडक देत अपघात केला. तसेच, या अपघातामुळे मागून येणाऱ्या एका क्रेटा गाडीचेही नुकसान झाले असून, दोन्ही एसटींमधील प्रवासी चालक, वाहक व प्रवाशांना लहान-मोठ्या दुखापत झाल्या आहेत. अपघातप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.