

राजापूर : राजापूर तालुक्यातील नाटे येथे चिरेखाणीत टाकलेले सडके तांदुळ खाऊन दोन गुरे दगावल्याची घटना उघडकीला आली आहे. अशाप्रकारे खराब झालेले तांदुळ उघड्यावर टाकणाऱ्याचा शोध घेवून कारवाई करावी व संबंधित शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जयेंद्र कोठारकर यांनी केली आहे.
शांताराम पोकळे यांची ही दोन्ही गुरे आहे. त्याबाबतची माहिती सामाजिक कार्यकर्ते जयेंद्र कोठारकर यांना मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी चिरेखाणीत सडलेल्या तांदळाची अनेक पोती कुणी अज्ञाताने टाकल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. दरम्यान, नाटे पोलिसांनी अशाप्रकारे सडके तांदुळ उघड्यावर टाकणाऱ्याचा शोध घ्यावा आणि त्याच्यावर कारवाई करावी, शिवाय संबंधित शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी कोठारकर यांनी केली आहे. दरम्यान, उघड्या चिरेखाणीत सडलेली तांदळाची पोती कुणी टाकली ते स्पष्ट झालेले नाही.