रत्नागिरी : समुद्रातील वादळी वार्यामुळे पर्ससीन नेट मासेमारीचा मुहूर्त हुकला. रविवारी पर्ससीन नेट मासेमारीसाठी नौका समुद्रात नेण्याची पूर्ण तयारी झाली होती. परंतु मासेमारीच्या पहिल्याच दिवशी बहुसंख्य नौका मिरकरवाडा बंदरात उभ्या होत्या.
जून महिन्यापासून पावसाळी मासेमारी बंदी सुरू झाली होती. पावसाळी मासेमारी बंदी दि. 1 ऑगस्टपासून उठल्यानंतर पारंपरिक मासेमारी सुरू झाली. दरवर्षी 1 सप्टेंबरपासून पर्ससीन नेट मासेमारी सुरू होते. पर्ससीन नेट मासेमारी नौकांची, जाळ्यांची आवश्यक असणारी दुरूस्ती पूर्ण करून घेण्यात आली. खलाशी, तांडेलना पर्ससीन नेट नौका मालकांनी आणले आहे. परंतु पहिल्याच दिवशी पर्ससीन नेट मासेमारीचा मुहूर्त समुद्रातील वादळी वार्यामुळे साधता आलेला नाही.
रत्नागिरी जिल्ह्याला 167 कि.मी.चा समुद्र किनारा लाभला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे 280 पर्ससीन नेट नौका आहेत. गेल्यावर्षीच्या मोसमात मासळी मिळण्याचा रिपोर्ट संमिश्र होता. अनेक नौका मालकांना कमी मासळी मिळाल्याने नुकसान सोसावे लागले. या पार्श्वभूमीवर नव्याने सुरू होणार्या हंगामात हे नुकसान भरून काढण्याच्या तयारीत असणार्या नौका मालकांचा हिरमोड झाला आहे. समुद्रातील वारे आणि उंच लाटांमुळे पहिल्याच दिवशी नौका समुद्रात मासेमारीसाठी पाठवता आलेल्या नाहीत.