

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील सायली येथे रविवारी सकाळी ७ वाजताच्या ३१ वर्षीय मुलाचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सायले कानालवाडी येथील स्वप्नील श्रीकांत कानाल हा मुंबई येथून गणेशोत्सवानिमित्त गावाला आला होता. घरात आनंदाचे वातावरण पसरले होते. पण काळाने झडप घातली आणि स्वप्नील ला ऐन सणासुदीच्या काळात कुटुंबापासून हिरावले.
घरातील वीज जोडणीतील बिघाड यामुळे ही घटना घडली असल्याचे प्राथमिक कारण स्पष्ट झाले आहे. स्वप्नील हा मितभाषी आणि आपल्या कुटुंबातील आणि वाडीतील प्रत्येकाला हवाहवासा वाटणारा एक हसतमुख स्वभावाचा होता. स्वप्नीलच्या जाण्याने संबंध सायले गावावर शोककळा पसरली आहे.
स्वप्नीलच्या माघारी पत्नी आणि दोन मुली त्यापैकी थोरली मुलगी तीन वर्षांची तर धाकटी मुलगी अवघ्या सहा महिन्यांची आहे. अत्यंत ह्रदयद्रावक या घटनेने प्रत्येकाच्या डोळ्यांत आसवांचा महापूर लोटला. स्वप्नीलच्या अंत्यसंस्काराला संपूर्ण गाव लोटला होता. ऐन सणासुदीच्या काळात घडलेल्या या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.