

दापोली : दापोली तालुक्यातील साखळोली मार्गावर वारंवार होत असलेल्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः या मार्गावरील तीव्र वळणांवर अपघातांचे प्रमाण वाढत असून वाहनचालकांसाठी हा रस्ता धोकादायक ठरत आहे.
बुधवारी या मार्गावर दोन ॲक्टिव्हा आणि एका इको गाडीचा समोरासमोर अपघात झाला. या दुर्घटनेत ३ जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, याठिकाणी यापूर्वीही अनेक लहान-मोठे अपघात घडले आहेत. मात्र अद्याप प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत.
रस्त्यावरील धोकादायक वळणांवर कोणतेही इशारा फलक, स्पीड लिमिट बोर्ड किंवा रिफ्लेक्टर नसल्याने रात्रीच्या वेळी वाहनचालकांना मोठा धोका निर्माण होत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने वळणांवर सावधानतेचे बोर्ड, गतीमर्यादा फलक तसेच आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. आज अपघात झाला, उद्या आणखी मोठी दुर्घटना होण्याची वाट पाहू नये. प्रशासनाने वेळेत उपाययोजना करणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.