

रत्नागिरी: शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आरटीई आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील मुलांसाठी 25 टक्के आरक्षित जागांवरील मोफत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत असून जिल्ह्यात 92 शाळांमध्ये 804 जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी आतापर्यंत 1 हजार 410 अर्ज प्राप्त झाले असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, प्रवेशाची धाकधूक संपली असून 6 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता लॉटरी जाहीर होणार आहे.
आरटीई प्रवेश प्रक्रियेच्या नियमात शासनाने बदल केल्याने अर्जात वाढ होत आहे. पूवी शासनाने पालकांना एक किमीच्या आतील शाळा निवडीची अट घातली होती. मात्र हे शक्य नसल्यामुळे 804 जागांसाठी 597 अर्ज दाखल झाले. 1 किमी अंतराची अट बदलण्याची मागणी राज्यभरातून सुरू होती व अखेर शासनाने नियमात बदल करून तीन किमीपर्यंत शाळा निवड करता येते. नियमात बदलानंतर अर्जाच्या संख्येत वाढ झाली असल्याचे सांगण्यात आले.
...तर जागा रिक्त राहण्याची शक्यता
आरटीई अंतर्गत खासगी शाळेत मोफत प्रवेशासाठी पालकांची काही ठराविक शाळांना पसंती असते. त्यामुळे स्पर्धा असते. आवडीची शाळा न मिळाल्यास पालक प्रवेश न घेतल्यास जागा रिक्त राहतात. गतवर्षी 91 शाळांमध्ये 702 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. मात्र पालकांच्या प्रतिसादाअभावी 126 जागा रिक्त राहिल्या होत्या.