राजापूर : मुंबई-गोवा महामार्गावरील राजापूर तालुक्यातील गंगातीर्थ फाटा येथे दोन वाहनांची धडक होऊन झालेल्या अपघातात चौघे जखमी झाल्याची घटना २ सप्टेंबर रोजी दुपारी ३.४० वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी राजापूर पोलिस ठाण्यात वाहन चालक शुभम नरेंद्र पाटील (वय २०, रा. कल्याण) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी प्रणित तुकाराम पाटील (३५, व्यवसाय-खासगी नोकरी, रा. प्लॉट नं. १०३, नावडे कॉलनी, फेज-२, पनवेल, जि. रायगड) हे त्यांच्या आई, पत्नी व मुलीसह टाटा टिगॉर कार (एमएच ४६ बीएच ९१९६) मधून मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करीत होते. गंगातीर्थ फाट्याजवळ आल्यानंतर मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी लेन बदलत असताना समोरून भरधाव येणाऱ्या महिंद्रा एक्सयूव्ही वाहनाने त्यांच्या कारला धडक दिली.या धडकेत टाटा टिगॉर कारचे मोठे नुकसान झाले. तसेच कारमधील प्रणित पाटील, त्यांची आई तारा तुकाराम पाटील (५०), पत्नी श्रद्धा प्रणित पाटील (३०) आणि मुलगी इरा प्रणित पाटील (११) जखमी झाल्या. त्यापैकी काहींना गंभीर दुखापत झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या अपघातास महिंद्रा वाहन चालक शुभम नरेंद्र पाटील याने वाहन अतिवेगाने व निष्काळजीपणे चालवून अपघात घडवून आणल्याचा आरोप आहे. याप्रकरणी राजापूर पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता कलम २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास राजापूर पोलिस करीत आहेत.