

रत्नागिरी : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. चोवीस तासात केवळ ६० मिमी पाऊस पडला आहे. सकाळी, रात्री पावसाचा जोर असून दुपारी मात्र उन्ह पडत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ७०.९४ टक्के इतका पाऊस झाला आहे, तर सरासरी २ हजार ३८६ मिमी इतका पाऊस पडला आहे.
जून महिन्यात म्हणावा तितका पाऊस झाला नव्हता. त्यामुळे ऐन पावसाळ्यात टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. नद्या, धरणातील पाणी पातळी ही खालावली होती. जूनच्या शेवटच्या आठवड्यात व जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले. त्यामुळे एका आठवड्यातच जूनचा बॅकलॉक भरून काढला. नदी, धरणातील पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे. जुलैनंतर ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर कमीच झाला आहे. महिना संपत आला असून अद्याप म्हणावा तसा मुसळधार पाऊस झालेला नाही. सरासरी २० ते ३० मिमी पाऊस पडत आहे. ऑगस्ट महिन्यात संततधार का होईना पाऊस झाल्यामुळे भात, नाचणी पिकांना आधार मिळाला आहे. आता सप्टेंबर महिन्यात परतीचा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.