

रत्नागिरी : रत्नागिरीतील विकासकामे आणि जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांच्या उपलब्धतेच्या मुद्द्यावरून राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भाजप आमदार प्रमोद जठार यांना अप्रत्यक्ष टोला लगावला. विकासकामे करणे ही महायुतीतील सर्व घटक पक्षांची सांघिक जबाबदारी असून चांगल्या कामांचे कौतुक करण्याची भूमिका सर्वांनी घ्यावी, असे ते म्हणाले.
पानवल धरण लोकार्पण सोहळ्यानंतर बोलताना सामंत म्हणाले, ‘कोणीतरी अकलेचे दिवे लावून रत्नागिरीत डॉक्टरांची कपात असल्याचे सांगितले. प्रत्यक्षात रत्नागिरी जिल्ह्यात डॉक्टरांची कोणतीही कमतरता नाही. रत्नागिरीचे वैद्यकीय महाविद्यालय राज्यातील उत्कृष्ट महाविद्यालयांपैकी एक आहे.’ गेल्या आठवड्यात आमदार प्रमोद जठार यांनी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयाला भेट दिल्यानंतर डॉक्टरांची कमतरता असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्याच पार्श्वभूमीवर सामंत यांनी हे वक्तव्य केले. महायुतीतील नेत्यांनी विकासकामांबाबत शंका उपस्थित करण्यास हरकत नसली, तरी एखादे विधायक काम मतदारसंघात होत असेल तर त्यातील त्रुटींचीच चर्चा करण्याऐवजी संबंधित यंत्रणा किती चांगले काम करत आहे, हेही लोकांसमोर मांडले पाहिजे, असे सामंत यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी माजी खासदार अनंत गीते यांचे उदाहरण देत विकासकामांमध्ये राजकीय स्पर्धेपेक्षा सहकार्य महत्त्वाचे असल्याचे सांगितले. ‘मी राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार असताना अनंत गीते यांनी माझ्या गावातील ग्रामदैवताच्या रस्त्यासाठी खासदार निधीतून १० लाख रुपये दिले. त्यांनी त्याचे भूमिपूजनही केले नाही. राजकीय मतभेद असतानाही त्यांनी विकासाला प्राधान्य दिले.