

रत्नागिरी : राज्यातील शासकीय कामकाज अधिक पारदर्शक, गतिमान आणि नागरिकाभिमुख करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनतर्फे राबवण्यात आलेल्या 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल रत्नागिरी जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांचा सन्मान करण्यात आला. हा गौरव शनिवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन करण्यात आला.
या उपक्रमांतर्गत राज्यातील विविध शासकीय कार्यालयांचे सात महत्त्वपूर्ण निकषांवर मूल्यमापन करण्यात आले. यामध्ये कार्यालयांची अधिकृत वेबसाईट, ‘आपले सरकार’ प्रणालीचा प्रभावी वापर, ई-ऑफिस प्रणालीची अंमलबजावणी, कार्यालयीन डॅशबोर्डची कार्यक्षमता, व्हॉटस्ॲप चॅटबॉटचा वापर, शासकीय कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) व ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा समावेश तसेच जीआयएस तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग या बाबींचा समावेश होता. 34 सर्वोत्तम पोलिस अधिक्षक कार्यालयामध्ये 200 पैकी 144.25 गुण मिळवत रत्नागिरी पोलिस अधीक्षक कार्यालय पाचवे ठरले आहे.
पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखत सर्व सामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी जिल्ह्यात मिशन प्रतिसाद, मिशन जीवन, मिशन प्रगती, रेडसॲप, बंदोबस्त ॲप, मिशन परिपूर्ती, मिशन फिनिक्स, रत्नागिरी सेफ ड्राईव्ह, मिशन पोलिस पाटील, डिजिटल गाववारी, मिशन सायबर जागृती, रत्नसेतू चॅटबोट, मिशन गस्त, मिशन निरीक्षण, मिशन संजीवनी, सामाजिक सलोखा समिती, स्वॅम्प पोलिस, प्रोजेक्ट सीगल, मिशन गती, मिशन ग्राम सुरक्षा, मिशन नवी दिशा, मिशन आरोग्य, मिशन जागृत नागरिक आणि व्हॉटसॲप चॅनल या 24 नावीन्यपूर्ण व लोकाभिमुख उपक्रम सुरु केले आहेत. पोलिस अधिक्ष्ाकाचे जिल्ह्यातून अभिनंदन करण्यात येत आहे.