

रत्नागिरी : कोकणच्या मातीत केवळ निसर्गच नाही, तर हजारो वर्षांपूर्वीच्या मानवी संस्कृतीच्या पाऊलखुणाही दडलेल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात विखुरलेली कातळशिल्पे हा महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासाचा एक अनमोल आणि विस्मयकारक ठेवा आहे. हाच ऐतिहासिक वारसा आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने जगासमोर मांडण्यासाठी राज्य सरकारने एक अत्यंत धाडसी आणि कौतुकास्पद पाऊल उचलले आहे.
रत्नागिरीतील या कातळशिल्पांवर जागतिक दर्जाचा माहितीपट तयार करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला असून, त्यासाठी तब्बल 14.50 कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे, अशी माहिती मंत्री आशिष शेलार यांनी दिली. रत्नागिरी जिल्ह्यातील साधारण 25 किलोमीटरच्या परिसरात 2000 हून अधिक कातळशिल्पे पसरलेली आहेत. ही शिल्पे म्हणजे आदिमानवाने कातळावर कोरलेली विविध चित्रे, नक्षीकाम आणि आकृत्या आहेत, ज्यातून त्या काळातील जीवनशैली आणि संस्कृतीचा उलगडा होतो.