

रत्नागिरी : पावसाने गेल्या दोन आठवड्यांपासून दडी मारली असली तरी रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणारे शीळ धरण अजूनही ओसंडून वाहत आहे. जुलैच्या पहिल्याच आठवड्यात धरण ओव्हरफ्लो झाले. त्यानंतर पाऊस फारच कमी प्रमाणात पडला असला तरी या धरणातील हजारो झरे पूर्ण क्षमतेने अंतःप्रवाहित झालेले असल्याने धरण अजूनही ओसंडूनच वाहत आहे.
शीळ धरणाची पाणी साठवण क्षमता ३.३३६ दशलक्ष घ. मी. असून सुमारे १८ ते २० दशलक्ष लिटर प्रतिदिन रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा केला जातो. २८ जून रोजी हे धरण ७० टक्के भरले. धरणात २.३५८ दशलक्ष घ. मी. पाणीसाठा झाल्यानंतर बंद असलेला सोमवारचा पाणीपुरवठाही सुरू झाला. पावसाने जोरदार हजेरी लावल्याने जसे धरण भरले तसेच पावसाचे पाणी जमिनीत मुरल्याने धरणातील हजारो झरे पुन्हा प्रवाहित झाले. शीळ धरण जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहू लागले. त्यानंतर पावसाने दडी मारली. सुमारे दोन आठवडे पाऊस फारच तुरळक पडला आणि दररोजचा पाणीपुरवठाही झाला तरी धरण आहे तसेच ओसंडून वाहत आहे. धरणातील झरे जोमाने प्रवाहित झालेले असल्याने धरणातील पाणीसाठा फारसा कमी झालेला नाही.