Jaitapur Project : जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प तत्काळ सुरू करा

आमदार प्रमोद जठार यांची मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी; प्रकल्पांत स्थानिकांना रोजगाराची संधी द्या
Jaitapur Project
आमदार प्रमोद जठार
Published on
Updated on

​रत्नागिरी : कोकणच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासाला मोठी गती देण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात नियोजित असलेल्या दोन नवीन अणुऊर्जा प्रकल्पांचे काम हाती घेण्यापूर्वी, जैतापूर येथील प्रलंबित अणुऊर्जा प्रकल्प सर्वप्रथम आणि तत्काळ सुरू करण्यात यावा, अशी आग्रही मागणी भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि कोकण विभाग समन्वयक प्रमोद जठार यांनी राज्य शासनाकडे केली आहे.

जैतापूर प्रकल्पासाठी आवश्यक असणारी जमीन आधीच संपादित करण्यात आली असून, सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेले संरक्षक भिंतीचे कामही पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता कोणतीही दिरंगाई न करता हा प्रकल्प तातडीने कार्यान्वित करून स्थानिक तरुणांना हक्काच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, असे जठार यांनी म्हटले आहे. रत्नागिरी येथे आयोजित एका विशेष पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आमदार प्रमोद जठार यांनी नुकतीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या संदर्भातील सविस्तर मागणीचे निवेदन सादर केले होते. या महत्त्वपूर्ण बैठकीत मुख्यमंत्र्यांनी जठार यांच्या भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद दिला असून, जैतापूर प्रकल्प प्राधान्याने सुरू करण्यास मान्यता दिली आहे. हा प्रकल्प लवकरात लवकर सुरू करून कोकणातील तरुणांच्या हाताला रोजगार देण्याचा प्रामाणिक प्रयत्न सरकारमार्फत केला जाईल, असे ठोस आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असल्याचे जठार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. ​या पत्रकार परिषदेत बोलताना आमदार जठार यांनी मोदी सरकारच्या यशस्वी कार्यकाळाचा दाखला देत, भाजपच्या आगामी १२ वर्षांच्या (२०२६ ते २०३८) 'कोकण संकल्प' जाहीरनाम्याचाही पुनरुच्चार केला. कोकणातील तरुणांचे मुंबई-पुण्याकडे होणारे स्थलांतर थांबवणे हे आपले मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

logo
Pudhari News
pudhari.news