

रत्नागिरी : आरटीई अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील ९२ शाळा पात्र असून पहिल्या यादीत ६५५ विद्यार्थ्यांची यादी लागली आहे. आतापर्यंत ५१४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. अद्याप १४१ जागा रिक्त आहेत. या जागांवरील प्रवेशासाठी आता प्राथमिक प्राथमिक शिक्षण संचनालयाने २९ मेपर्यंत मुदतवाढ दिली आहे. ही अंतिम मुदतवाढ असून यानंतर कोणतीही मुदतवाढ नसणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
आरटीई अंतर्गत राज्यातील आर्थिक दुर्बल आणि वंचित गटातील विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत खासगी शाळातील २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश देण्यात येतो. त्यासाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येतो. आरटीई अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना ९२ खासगी शाळांमध्ये मोफत शिक्षणांची संधी मिळत आहे. त्यामध्ये ८०४ इतक्या रिक्त जागा आहेत. पालकांनी आवश्यक कागदपत्रे सादर करीत ५१४ जागेवर आपल्या पाल्यांचा प्रवेश केला आहे.
चिपळूण, दापोली, लांजा, मंडणगड, रत्नागिरी, संगमेश्वर या तालुक्यात विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे. आणखी काही तालुक्यातून प्रवेश कमी झाले आहेत. ३० एप्रिलरोजी प्रवेशासाठी शेवटची मुदत देण्यात आली होती. जिल्ह्यासह राज्यभरात आणखी प्रवेश झालेले नसल्यामुळे प्रवेशासाठी ८ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मुदतवाढीनंतरही रत्नागिरी जिल्ह्यात अद्याप १४१ विद्यार्थ्यानी प्रवेश घेतलेला नाही. दरम्यान, आता पुन्हा एकदा २९ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पसंतीची शाळा न मिळाल्यामुळे मागील वर्षी मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहिल्या होत्या. यंदाच्या वर्षी काही जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे.