

चिपळूण : तालुक्यातील खांदाट पाली ते निरबाडे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. वाहनचालकांची खड्डे चुकवताना दमछाक होत आहे. तसेच या मार्गावरील पुलावर देखील हीच परिस्थिती असल्याने वाहन चालकांना आपला जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहेत. पावसाने विश्रांती घेतली असल्याने आता तरी या रस्त्याचे डांबरीकरण व्हावे, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
कळंबस्ते - धामणंद मार्गावरील खांदाट पाली ते निरबाडे मार्गे काडवली तसेच पंधरागावाकडे जाण्यासाठी हा जवळचा मार्ग आहे. यामुळे बहुतांशी वाहनचालक या मार्गाचा सर्रास वापर करतात. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून खांदाट पाली ते निरबाडे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. या मार्गावर मोठे-मोठे खड्डे पडले आहेत. पावसात तर या खड्ड्यांमधून पाणी साचत असल्याने वाहन चालकांना खड्डे चुकवणे अवघड होऊन बसत आहे. विशेष म्हणजे वाहने खड्ड्यात आपटून वाहन चालकाला त्रास सहन करावा लागत आहे.
हा रस्ता खड्ड्यात की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. चढ अथवा उतारात देखील हीच परिस्थिती असून खडी देखील मोठ्या प्रमाणात वर आली असल्याने दुचाकी घसरून अपघात होत असल्याने नागरिकांच्या जिवावर बेतत आहे. या मार्गावरील पुलावर देखील हीच परिस्थिती असून पावसाळ्यापूर्वी येथील ग्रामस्थांनी काही खड्डे सिमेंट काँक्रीटने बुजवले आहेत. मात्र, अन्य खड्डे ‘जैसे थे’ असल्याने या पुलावरून वाहने चालवताना जीव मुठीत घ्यावा लागत आहे. तसेच हा पूल जुना असल्याने नव्याने पूल बांधण्यात यावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांना करण्यात येत आहे
याचबरोबर चारगावची ग्रामदेवता श्री रामवरदायिनी मंदिरापासून ते काडवलीकडे जाणाऱ्या पुलावर देखील तशीच परिस्थिती आहे २१ जुलै २०२१ च्या महापुरात या पुलाचे रेलिंग तुटलेले असून अजूनही या पुलाची डागडुजी करण्यात आलेली नाही. हा पूल देखील अनेक वर्षांपूर्वी बांधण्यात आला असून नव्याने पूल बांधण्याची गरज निर्माण झाली आहे. या पुलावरील खड्डे चुकवताना रेलिंग नसल्याने वाहन नदीत कोसळण्याचा धोका नाकारता येत नाही. एकंदरीत हा मार्ग खड्डेमय तितकाच धोकादायक बनलेला असून शासन प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.