

गणपतीपुळे : गणपतीपुळे येथील समुद्रात पर्यटनासाठी आलेले छत्रपती संभाजीनगरचे पाच तरुण वाहून गेल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली. या पाचही जणांचे मृतदेह शोधण्यात यश आले आहे. शनिवारपासूनच युद्धपातळीवर शोध मोहीम राबवण्यात येत असून शनिवारीच एक मृतदेह सापडला, तर अन्य चौघांचे मृतदेह रविवारी सापडले. या दुर्दैवी घटनेमुळे गणपतीपुळे परिसर व पर्यटकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिस यंत्रणेकडून ‘कस्टम’ आणि स्थानिक मच्छीमारांच्या बोटींच्या सहाय्याने समुद्रात शोधमोहीम राबवण्यात आली. यामुळे प्रेम आदमाने, यश कांबळे, आनंद नरवडे, अनिकेत हिवराळे, आदित्य राऊत या पाचही तरुणांचे मृतदेह सापडले आहेत.
गणपतीपुळे येथे येणाऱ्या पर्यटकांनी समुद्राची सद्य:स्थिती आणि धोका लक्षात घेऊन समुद्रस्नानासाठी पाण्यात उतरू नये. पर्यटकांनी सुरक्षित अंतर ठेवून दुरूनच समुद्राचा आनंद घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
समुद्रात बुडालेल्या पाच तरुणांमध्ये प्रेम आदमाने हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. यश कांबळे याचे वडील हयात नसून तोही आपल्या कुटुंबाचा एकुलता एक आधार होता. आनंद नरवडे हाही आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे, तर आदित्य राऊत व अनिकेत हिरवाळे या दोघांना प्रत्येकी एक भाऊ आणि एक बहीण आहे. या पाचही तरुणांच्या नावांची माहिती समोर आली असून चारजणांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.