

चिपळूण : चार दिवस कोसळणार्या धुवांधार पावसामुळे चिपळूण तालुक्याच्या ग्रामीण भागात अनेक घरावर झाडे किंवा फांद्या पडून लाखोंचे नुकसान झाले आहे. या शिवाय अनेकठिकाणी विद्युत खांब कोसळून वीजपुरवठादेखील खंडित झाला आहे. प्रशासनाच्यावतीने नुकसान झालेल्या घरांचे पंचनामे करण्यात येत आहेत. बुधवारी चार दिवसानी चिपळूणमध्ये सूर्यदर्शन झाले. दिवसभर अधूनमधून सरी येत होत्या. दरम्यान, वाशिष्ठी व शिव नदीची पाणी पातळी कमी झाली असून जनजीवन सुरळीत आहे.
चिपळूण शहर परिसरासह ग्रामीण भागात गेले चार दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. आजअखेर ११६६ मि.मी. पावसाची नोंद झाली असून अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. रविवारी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, पाऊस कमी झाल्याने धोका टळला. दोन दिवस पावसाचा जोर कमी झाल्याने शहरातील व्यापार्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे, परंतु सोसाट्याच्या वार्यामुळे शहरासह ग्रामीण भागात ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत.
यामध्ये कापसाळ येथील संतोष कृष्णा मोरे, अंजली यशवंत मोरे, प्रभाकर यशवंत मोरे, हरिश्चंद्र यशवंत मोरे यांच्या घराच्या छप्परावर झाड कोसळल्याने सुमारे १५ हजार रुपये, गाणे-खडपोली येथील गंगाराम भागोजी गजमल यांच्या घराच्या छप्पराचे ४२ हजार रूपये, सखाराम भागोजी गजमल यांच्या घराचे अंशतः १८ हजार रुपये, बामणोली येथील तांबेवाडीत सभागृहावर आंब्याचे झाड कोसळून नुकसान, नांदगाव भुवडवाडी येथील श्रीकांत लक्ष्मण ठोंबरे यांच्या घरावर झाड पडून अंशतः, कळवंडे माडवाडी येथील सुनंदा श्रीपत बेचवडे यांच्या घरावर झाड पडून, टेरव येथील सुनिता यशवंत कदम यांच्या गोठ्यावरील छप्पर कोसळून, यशवंत वासकर यांच्या घरावर झाड पडून, उमरोली येथील विजय सखाराम जाधव यांच्या घरावर झाड पडल्याने २५ हजार रुपये, खडपोली येथील वसंत रामचंद्र भुवड, वासुदेव रामचंद्र भुवड यांच्या घरावर फणसाचे झाड पडल्याने छप्पर व पाण्याच्या टाकीचे ३० हजार रूपये, वहाळ येथील कल्पना झिमाजी भागडे यांच्या घरावर आंब्याचे झाड पडल्याने ४ हजा रुपये, कालुस्ते बु. येथील सय्यद हुसैनी यांच्या घरामागील बांध कोसळून, नांदिवसे येथील सुभाष आत्माराम शिंदे यांची कंपाऊंड वॉल कोसळून १५ हजार रुपये, नांदिवसे येथील विजय हिरवे यांचा वाडा पूर्णतः कोसळून ८५ हजार रुपये व नांदिवसे येथील संतोष धोंडू शिंदे यांच्या घराची भिंत कोसळून ५८ हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.